पुणे / प्रतिनिधी :
अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार 100 टक्के होणार आहे. मंत्रीपदाचे वाटप कसे करायचे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील, असे विधान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. केसरकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या किती जागा लढवायच्या, किती मागायच्या हा सगळा विषय वरिष्ठांचा आहे. एखाद्या निवडणुकीची तयारी करतो तेव्हा राष्ट्रीय नेते एकत्र येतात. लोकसभा निवडणुकीची तयारी सगळय़ांनी सुरू केली आहे. 22 जागा मागितल्याबाबत प्रवक्ता म्हणून मी एकदाही बोललो नाही. भाजप आणि आमचे जागा वाटपाचे सूत्र पूर्वीपासून ठरलेले आहे. लोकसभेसाठी भाजप नेहमीच जास्त जागा घेत आलेला आहे. कारण ते केंद्रात असतात. शिवसेना राज्यात काम करते. पण आमच्या वाटेला ज्या जागा नेहमी येतात त्याबद्दल आम्ही तयारी केली तर चुकीचे काय आहे? असा सवाल त्यांनी केला.