तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराचा मुद्दा
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मंगळवारी निशाणा साधला आहे. संसदेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना अनेक प्रश्न विचारले, परंतु पंतप्रधानांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर न देता अनेक तास कशाप्रकारे बोलले जावे हे कौशल्य मी पंतप्रधानांकडूनच शिकलो अशी उपरोधिक टिप्पणी स्टॅलिन यांनी केली आहे.
ईडीने विरोधी पक्षांना एकजूट केले असल्याचे पंतप्रधान मोदींनी संसदेत म्हटले होते. त्यांच हे वक्तव्य एकप्रकारे कबूलनामाच आहे. विरोधी पक्षांच्या विरोधात सूडाची भावना बाळगून राजकारण करत असल्याचे कुठल्याही पंतप्रधानाने पहिल्यांदाच संसदेत मान्य केले आहे. आमच्या देशाच्या लोकशाहीसाठी सूडाचे राजकारण योग्य नसल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर अनेक आरोप झाले, परंतु त्यांनी यातील कुठल्याही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. लोकांचा विश्वास हेच माझे सुरक्षाकवच असल्याचे मोदी सांगतात. परंतु लोक अशाप्रकारे विचार करत नाहीत. पंतप्रधान मोदींच्या भाषणात मोठमोठय़ा गोष्टींचा उल्लेख होता, परंतु बीबीसी माहितीपट आणि अदानींसोबतच्या संबंधांवरून कुठलेच उत्तर नव्हते. अदानी समुहाशी केंद्र सरकारचे संबंध असण्याचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. याप्रकरणी संसदेत चर्चा होणे गरजेचे आहे. याप्रकरणाची चौकशी संसदीय समितीकडे सोपविण्यात यावी असे स्टॅलिन म्हणाले.
राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणातील काही भाग संसदेच्या नोंदीतून हटविण्याचा अर्थ ते लोकांच्या मनातूनही हटतील असा होत नाही. संसदेत राहुल यांनी पंतप्रधान मोदींना विचारलेले प्रश्न योग्यच होते. पंतप्रधानांनी या आरोपांवर काहीही न बोलणे धक्कादायक होते असा दावा द्रमुक अध्यक्षांनी केला आहे.