ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील सामूहिक चेतना हीच खरी देशाची ऊर्जा आहे. देशवासियांमधील एकजुटता महत्वाची आहे. देशवासियांमधील सामर्थ्य राष्ट्रध्वजाने दाखवलं आहे. आता पूर्ण ताकदीने देशाची आगेकूच सुरू आहे. विविधता ही भारताची शक्ती असून, भारत लोकशाहीची जननी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी देशवासियांना संबोधित केले. मोदी म्हणाले, स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं, त्यांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. देशासाठी प्राण देणारे, देशाच्या विकासासाठी कार्यरत असणारे, पोलीस, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी या सगळ्यांच्या योगदानाचंही आज स्मरण करुया.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा देशभर जल्लोष होत आहे. आजचा दिवस ऐतिहासिक असून, आजपासून नव्या दिशेने देशाची वाटचाल राहील.
भारताची विविधता हीच भारताची खरी शक्ती आहे. भारत लोकशाहीची जननी आहे. ज्यांच्या अंगातच लोकशाही असते, ते जेव्हा संकल्प करतात, तेव्हा जगातली मोठमोठी साम्राज्यही हादरतात. ही लोकशाहीची जननी असलेल्या आपल्या भारताने हे सिद्ध केलं की आपल्याकडे अनमोल सामर्थ्य आहे. 75 वर्षांच्या या यात्रेमध्ये अनेक संकटांनंतर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. 2014 मध्ये मला देशवासियांनी दायित्व दिलं. स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करण्याची संधी मिळाली.
कुटुंबव्यवस्था ही भारताची ताकद आहे. आपल्या परंपरांचा आपण अभिमान बाळगायला हवा. आम्हाला भारताच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. आता आपल्याला पाच मोठे संकल्प पुढे घेऊन जायचं आहे. विकसित भारत हा पहिला संकल्प. दुसरा संकल्प म्हणजे गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका. आपल्या वारशाचा अभिमान बाळगा हा तिसरा संकल्प. एकतेचे सामर्थ्य हा चौथा आणि नागरिकांकडून कर्तव्याचे पालन हा पाचवा संकल्प.