पाच वाहने दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, तीन महागडय़ा ‘हायड्रॉलिक’ पद्धतीच्या वाहनांचा समावेश
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे-काकोडा पालिकेने आणलेली लाखो रुपये किमतीची कचरावाहू वाहने सध्या मोडकळीस येऊन गंज खात पडली असल्याचे दिसून येऊ लागले आहे. याबद्दल कुडचडे मतदारसंघातील लोकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या पालिका बैठकीत सदर विषय नगरसेवक दामोदर बेणे यांनी मांडला व त्यांना इतर नगरसेवकांचाही पाठिंबा लाभला. यावेळी बेणे यांनी सांगितले की, कित्येक वेळा सांगून सुद्धा कचरावाहू वाहनांवर ताडपत्री घालण्यात येत नाही. तसेच या वाहनांचे ‘आरटीओ पासिंग’ कधी केलेलेच नाही. त्यामुळे कदाचित सदर वाहनाला अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण असणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गेल्या दहा वर्षांत कुडचडेत कचऱयाचे प्रमाण वाढत गेलेले असून यावर उपाय म्हणून पालिका मंडळाने निर्णय घेऊन सुरुवातीला कचरा उचलण्यासाठी वाहने खरेदी केली होती. त्यानंतर सदर वाहनांतून कचरा नेणे त्रासदायक होऊ लागल्याने काही महिन्यांनंतर स्वयंचलित पद्धतीने कचरा उचलणारी ‘हायड्रोलिक’ वाहने आणली गेली. त्यांना फारसे मनुष्यबळ लागत नसल्याने व्यवस्थित काम होऊ लागले होते. पण अचानक सदर वाहनांमध्ये समस्या येऊ लागल्या. त्यामुळे सदर वाहने तशीच ठेवण्यात आली आहेत.
सध्या कुडचडे चर्च रोडवर ज्या ठिकाणी कचरा विलगीकरण करण्यात येते त्या ठिकाणी नादुरुस्त झालेली लाखो रुपये किमतीची एकूण पाच वाहने पडून असल्याचे दिसून येत आहे. त्यात तीन वाहने ‘हायड्रोलिक’ प्रकारची आहेत. सदर वाहने महाग असून सुद्धा त्यांची दुरुस्ती करण्यात पालिकेने कधी लक्ष घातले आहे असे वाटत नाही, अशा प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहेत. सदर ठिकाणी या वाहनांच्या भोवती झाडे-झुडपे वाढलेली दिसत आहेत. तसेच काही वाहने टायरअभावी दगडांवर ठेवलेली आहेत.
विलगीकरणाचे ठिकाण अन्यत्र हलवावे
त्याचबरोबर ज्या ठिकाणी कचरा विलगीकरण करण्याचे काम चालते तेथे दोन्ही बाजूंनी इमारती व घरे आहेत. सदर घरांत व इमारतींत राहणाऱया लोकांना सतत कचऱयाच्या दुर्गंधीला तोंड द्यावे लागते, अशी कैफियत येथे राहणाऱया लोकांकडून व्यक्त करण्यात आली. तसेच सदर ठिकाणी पडलेला कचरा कुजण्याबरोबर घाणेरडे दुर्गंधीयुक्त पाणी कायम साचलेले असते. त्यामुळे येथे मलेरियासारखे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. असे संकट स्थानिक लोकांवर येऊ नये यासाठी सदर कचरावाहू वाहने व कचरा ठेवण्यासाठी सुरक्षित जागा शोधून तेथे विलगीकरणाचे काम हलवावे, अशी मागणी लोक करू लागले आहेत.