विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर टीका
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस, आप व आरजी, गोवा फॉरवर्ड या विरोधी पक्षीय आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर तसेच सरकारवर टीका केली तर सत्ताधारी आमदारांनी राज्यपालांच्या भाषणाचे, सरकारचे समर्थन केले. महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, रस्त्यांची दुर्दशा, खाणबंदी, वाढते अमलीपदार्थ, कोरोनाची भरपाई, पाणी अशा विविध प्रश्नांवर विरोधी आमदारांनी सरकारच्या विरोधात आवाज उठवला आणि त्याबाबत राज्यपालांच्या भाषणात काहीच नसल्याचे समोर आणले.
अमलीपदार्थ शाळा कॉलेजात सर्वत्र पोहोचले असून ते आरामात उपलब्ध होतात याकडे विरोधकांनी लक्ष वेधून त्याबाबत उपाय योजना करण्याची मागणी केली. रुडॉल्फ फर्नांडिस, युरी आलेमाव, संकल्प आमोणकर यांनी कोळसा प्रदूषणाची समस्या मांडली आणि जनतेवर त्याचा विपरित परिणाम होत असल्याने गोव्यातील कोळशाची वाहतूक बंद करावी अशी मागणी केली. आर्थिक सहाय्य योजनेचे पैसे अनेकांना अनेक महिने मिळत नाहीत. त्यामुळे लाभार्थींची कुचंबणा होते, असे विरोधी आमदारांनी निदर्शनास आणले. ‘सरकार तुमच्या घरी’ मोहीम म्हणजे निवडणूक तयारी होती, अशी टीकाही विरोधकांनी केली.
राजेश फळदेसाई व केदार नाईक यांनी त्यांच्या मतदारसंघातील फेरीबोटींचे प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या अनियमितपणामुळे सर्वांना त्रास होत असल्याचे दाखवून दिले. त्यावर तोडगा वाढण्याची मागणी केली.
आमदार दिगंबर कामत यांनी पणजीतील आझाद मैदानावर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या उपोषणाचा प्रश्न उपस्थित करून तो त्वरित सोडविण्याची मागणी केली. त्यांच्याकडून कोणतेही हमीपत्र घेऊ नका आणि त्यांना सेवेत घ्यावे असे ते म्हणाले. विजय सरदेसाई व मायकल लोबो यांनी कामत यांच्या मागणीस समर्थन दिले व आपल्यातर्फे हमीपत्र देण्याची तयारी दर्शवली तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्या सेविकांना बोलावून घेऊन त्यांचा प्रश्न सोडवण्याचे मान्य केले.
जेनिफर मोन्सेरात, विरेश बोरकर, क्रूझ सिल्वा, व्हॅन्सी व्हिएगश, आंतोन वाझ, प्रेमेंद्र शेट यांची राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषणे झाली आणि त्यांनी आपापली मते मांडले.