माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
प्रतिनिधी/ सातारा शहर
सध्याचे सरकार हे ज्या पद्धतीने सत्तेवर आले त्याची नुकसान भरपाई सुरू आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार ज्या पद्धतीने बाहेर निघत आहेत आणि आमदारांमधील असंतुष्टता पहाता हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे विधान रविवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रा ही अंतिम टप्प्यात असून श्रीनगर येथे याची सांगता होणार आहे. या यात्रेला मिळालेला सामान्य लोकांमधील प्रतिसाद पाहता येत्या 26 जानेवारीपासून राष्ट्रीय कांग्रेसतर्फे ‘हात से जोडो हात’ हे उपक्रम राबविण्यात येणार असून या संदर्भात देशातील सर्वच जिल्हय़ात कांग्रेस पदाधिकाऱयांच्या बैठका घेण्याचे आदेश मिळाले असून सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जिह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक रविवारी पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
यापूर्वी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना पृथ्वीराज बाबा यांनी अनेक विषयात हात घातला. मुख्यमंत्री असोत की अब्दूल सत्तार, शंभूराज देसाई की उदय सामंत यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि शिंदे गटातील अंतर्गत असंतोष पाहता सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार कधीही पडेल आणि हे सरकार लवकरच पडेल असे भाकीत यावेळी चव्हाण यांनी केले. येत्या काळातील सर्वच निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित लढू.
येत्या फेब्रुवारीमध्ये अर्थसंक्लपीय अधिवेशनापूर्वीच हे सरकार पडेल या भितीमुळे हे सरकार उर्वरित 23 मंत्रीपदे भरत नाही. राज्यासह देशातील स्वायत्त संस्था या स्वतंत्ररित्या काम करत नाहीत. त्यांच्यावर प्रचंड दबाब आहे असे हे दडपशाही सरकार जनता उधळून लावेल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
येत्या प्रजासत्ताक दिनापासून देशभरात सुरू होणाऱया ‘हात से जोडो हात’ या अभियानाची देशात सुरुवात होत असून याकरिता ग्राऊंड लेव्हलवर नियोजन सुरू असून प्रत्येक राज्यासाठी एक समन्वयक नेमण्यात आले आहे.
माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांची महाराष्ट्र प्रदेश समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तर पृथ्वीराज चव्हाण हे कर्नाटक समन्वयक असतील त्याचप्रमाणे पुणे जिह्याची जबाबदारीही चव्हाण यांच्याकडेच देण्यात आली.
या बैठकीत सातारा जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रजनी पवार, रफिकभाई बागवान, झाकिर पठाण, नरेश देसाई, मनोजकुमार तपासे, महिला जिल्हाध्यक्ष अल्पना यादव, राजिया शेख, प्राची ताकतोडे, मनिषा पाटील, सुषमा राजेघोरपडे, अशोक उत्तेकर, विराज शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भारत जोडोमुळे काँग्रेस पुन्हा नव्या दमाने मैदानात
काँग्रेस पक्षाला लागलेली मरगळ आता संपली असून कांग्रेस पुन्हा नव्या दमाने नव्या जोमाने मैदानात उतरेल याची प्रचिती आज काँग्रेस कमिटीमधील बैठकीवेळी आली. एरवी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणाऱया काँग्रेसच्या बैठका, कार्यकर्त्यांचा अभाव, उदासिनता हे चित्र आज नव्हते. आजच्या बैठकीला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती अगदी पोर्चमध्येही कार्यकर्त्यांनी खुर्चा टाकून बैठकीत उपस्थिती लावली तर पार्कींगमध्ये गाडय़ा लावण्यासही जागा अपुरी पडली हे सर्व सकारात्मक बदल फक्त भारत जोडो यात्रेचे फलित असून येत्या काळात जिह्यात काँग्रेस पुन्हा पहिल्यासारखी पहायला मिळाली तर आश्चर्य व्हायला नको.