पुणे / प्रतिनिधी :
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांतील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सोमवारी जळगावात सर्वांत कमी तापमान 8.2 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले असून, पुण्यातही या हंगामातील किमान तापमानाचा 8.8 अंश सेल्सिअस इतका नीचांक नोंद झाला आहे.
यंदा पावसाळा लांबला. त्यानंतर दिवाळीपासूनच थंडी जाणवू लागली. मागच्या 4 ते 5 पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत चांगलाच कडाका निर्माण झाला आहे. सध्या उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. परिणामी राज्यासह लगतच्या भागातील तापमान घटले आहे. मागच्या दोन दिवसांत काही भागातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस च्या खाली आले आहे. पुढच्या दोन दिवसांत थंडीचा हा कडाका वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अधिक वाचा : देवेंद्रजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती!
राज्याच्या काही भागांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे : पुणे 8.8, नगर 10.1, कोल्हापूर 14.8, महाबळेश्वर 10.4, नाशिक 9.2, सांगली 12.5, सातारा 13, सोलापूर 12.7, मुंबई 20.9,अलिबाग 16.3, रत्नागिरी 17.2, औरंगाबाद 8.9, अकोला 12, अमरावती 11.7, नागपूर 11.4, वाशिम 13.2, वर्धा 12.2 गोंदिया 10.5