सरचिटणीस किरण गावडे : शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना अभिवादन : सर्वांनी झोकून देऊन काम करणे आवश्यक
बेळगाव : सीमाभागावर अन्याय करणारा महाजन अहवाल गाढावा व सीमावासीयांना न्याय द्यावा यासाठी मुंबई येथे काढण्यात आलेल्या मोर्चावेळी शिवसेनेने 67 हुतात्मे दिले. तेव्हापासून आजतागायत सीमाप्रश्नाबाबत लोकशाही पायदळी तुडविली जात आहे. मराठी भाषिकांना इच्छा नसतानाही त्यांच्या घरांवर राष्ट्रीय पक्षाचे झेंडे लावले जात आहेत. या सर्व प्रकारांमुळे नाराजी वाढत असून समितीच्या सर्व उमेदवारांना निवडून येण्यासाठी पाठबळ द्यावे लागणार असल्याचे प्रतिपादन शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी केले.
शहर महाराष्ट्र एकीकरण समिती व कोनवाळ गल्ली येथील सिंह गर्जना युवक मंडळाच्यावतीने बुधवारी कोनवाळ गल्ली येथे हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम झाला. माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले, गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली समन्वय बैठक पार पडली. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी कर्नाटक सरकारने केलेली नाही. बेळगाव शहर हे म. ए. समितीचा केंद्रबिंदू असल्याने तालुक्याप्रमाणेच येथे एकी व्हावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शुभम शेळके म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सीमाप्रश्नासाठी 100 दिवसांचा तुरुंगवास भोगला आहे. परंतु सध्याच्या नेतेमंडळींकडून मात्र बेळगावकडे दुर्लक्ष होत आहे. सीमाप्रश्न सोडवायचाच असेल तर महाराष्ट्राला झोकून देऊन काम करावे लागेल. खानापूर म. ए. समितीचे यशवंत बिर्जे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर यांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, नगरसेविका वैशाली भातकांडे, युवा समितीचे अंकुश केसरकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, वर्षा आजरेकर, सचिन केळवेकर, सुहास किल्लेकर, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, विवेक गिरी, राष्ट्रवादीचे रामचंद्र मोदगेकर, सिंह गर्जना युवक मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गवळी, उपाध्यक्ष विनायक बेळगावकर, बाळासाहेब मासळणकर, दिनेश देसूरकर, चंद्रशेखर, शेखर देसूरकर, नंदू देसूरकर, शशिकांत हावळ, अनंत कडोलकर, अनिल गवळी, बाळू सुणगार, नागेश काकडे, चंद्रकांत कारूडेकर यासह इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ सूर्यवंशी यांनी केले.