कोणत्याही परिस्थितीतही मशाल बेळगावात पोहचविण्याचा शिवसैनिकांचा निर्धार; कर्नाटक राज्यात जाणाऱ्या पाण्याचा स्पर्श म्हणजे कर्नाटकला स्पर्श केल्याची भावना; राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी
कागल / प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात एक नोव्हेंबर हा दिवस राज्योत्सव म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधव काळादिन म्हणून साजरा करतात. याच्या पूर्वसंध्येला आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर ते बेळगाव मशाल दौडीचे आयोजन केले होते. कागलच्या दूधगंगा नदीवरील पूलावर कर्नाटक पोलीसांनी ही मशाल दौड रोखली. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मारला. कार्यकर्त्यांनी मशालीसह दूधगंगा नदीपात्रात उतरून पाण्याला स्पर्श केला. कर्नाटक राज्यात जाणाऱ्या पाण्याचा स्पर्श म्हणजे कर्नाटकला स्पर्श केला असून उद्या कोणत्याही परिस्थितीतही मशाल बेळगावात पोहचविणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी सांगितले.
‘बेळगांव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी गेली अनेक वर्ष कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांचा लढा सुरू आहे. त्याला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठबळ दिले आहे. उद्या कर्नाटक राज्यात साजरा केल्या जाणाऱ्या राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने ‘दिवस वेदनांचा, दौड मशालीची’ या टॅगलाईन खाली कोल्हापूर ते बेळगांव मशाल दौडीचे आयोजन केले होते. या दौंडीच्या पार्श्वभूमीवर कागलच्या दूधगंगा नदी पूलावर महाराष्ट्र कर्नाटक पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे दूधगंगा नदीपूलाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दरम्यान कोल्हापूरातील दसरा चौकातून या मशाल दौडीला प्रारंभ करण्यात आला. उजळाईवाडी – कागल मार्गे ही दौड महामार्गावरून कर्नाटक राज्यात प्रवेश करणार होती. मात्र कर्नाटक पोलिसांनी ही दौड दूधगंगा नदीपूलावरच रोखल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पुलावरच ठिय्या मारला. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी कर्नाटक वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्नाटक प्रशासन मशालीसह कार्यकर्त्यांना राज्यात प्रवेश न देण्यावर ठाम राहिले.
यावेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मशालीसह दूधगंगा नदीपात्रात उतरण्याचा निर्णय घेतला. सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे मोजक्या कार्यकर्त्यांसह नदीपात्रात उतरले. नदीतील पाण्याला स्पर्श करणे म्हणजे कर्नाटक राज्याला स्पर्श केल्यासारखे आहे. याच्यात आपण विजयी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
देवणे म्हणाले, देशासह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात भाजपा सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून भाजपा दडपशाही करत आहे. ही मशाल कोणत्याही परिस्थितीत उद्या बेळगांवमधील मराठा भवनातील होणाऱ्या कार्यक्रमात पोहचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार, रविकरण इंगवले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.