अनेक विषय अर्ध्यावरच : विरोधी पक्षांची खरपूस टीका
प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे एक दिवस आधीच गुरुवारी सायंकाळी सूप वाजले. विधानसभेत अनेक विषयांवरील चर्चा शिल्लक असतानाच सभाध्यक्षांनी कामकाज अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केले.
30 डिसेंबरपर्यंत अधिवेशन जाहीर केले होते. मात्र, पूर्ण वेळ अधिवेशन चालविण्यात कोणालाच रस राहिला नाही. त्यामुळे कामकाज सल्लागार समितीत निर्णय घेऊन एक दिवस आधी अधिवेशन आटोपते घेतले. 9 दिवस चाललेल्या अधिवेशनात विधानसभेत 41 तास 20 मिनिटे चर्चा झाल्याचे सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी जाहीर केले.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी 40 टक्के कमिशन, व्होटरगेट घोटाळ्यासंबंधी चर्चेला अनुमती देण्याची मागणी केली. याचवेळी सत्ताधारी गटातून हल्लाबोल सुरू झाला. तुम्हाला चर्चाच करायची होती तर नऊ दिवसांत का केली नाही? असा प्रश्न मंत्री सुनीलकुमार यांनी केला. त्यामुळे काँग्रेस व भाजप आमदारांमध्ये गदारोळ सुरू झाला. गदारोळ सुरू असतानाच सभाध्यक्षांनी बेमुदत कामकाज तहकूब केल्याचे जाहीर केले. सभागृहातून बाहेर पडताना सिद्धरामय्यांनी ‘आजवरच्या इतिहासातील हे भ्रष्ट सरकार आहे. त्यांच्याकडून कोणती चांगली अपेक्षा करणार?’ असे टोला लगावला.
कर्ण-अर्जुनाची तुलना
पुरवणी अंदाजपत्रकावरील चर्चेवेळी काँग्रेसच्या कृष्ण भैरेगौडा यांनी भगवद्गीतेचा उल्लेख केला. अर्जुनाला नेहमी कौतुक आवडते. श्रीकृष्ण अर्जुनाचे कौतुक करायचे. आम्ही आमचे कर्म केले आहे. एक प्रमुख व जबाबदार विरोधी पक्ष म्हणून यामधील त्रुटी दाखविल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्ण-अर्जुनाचे उदाहरण दिले. अर्जुनाला कौतुक आवडायचे. ‘तू लक्ष्यावर अचूक बाण मारणारच’ असे कौतुक केले की अर्जुनाचा बाण हमखास लक्ष्य भेदत होता. मात्र, कर्ण तसा नव्हता. तुला मारता येत नाही, असे डिवचल्यावरच कर्णाचे बाण लक्ष्यावर अचूक लागत. आम्ही कर्णाच्या भूमिकेत आहोत. तुम्ही कितीही डिवचला तरी आम्ही राज्याचे हित साधणारच’ अशा शब्दात प्रतिटोला हाणला.