शाहूवाडीत 10 ठिकाणी 200 वर्षे उत्खनन चालेल इतका खनिजसाठा : 1 कोटी 95 लाख मेट्रीक टन बॉक्साईडची उपलब्धता : परवानगीसाठी यंत्रणा लागली कामाला
कोल्हापूर/ संतोष पाटील
शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर, परखंदळे, परळी, आंबर्डे, सावर्डे बुद्रुक येथील सडय़ांचा परिसरात उच्च प्रकारातील लॅटेराईटचे अधिक प्रमाण असलेल्या बॉक्साईडचे उत्खनन तब्बल 200 वर्षे चालेल इतका मोठा साठा आहे. प्राथमिक अहवालातच या परिसरात एक कोटी 95 लाख 84 हजार 934 इतका खनिजसाठा असल्याची माहिती पुढे आली आहे. या खनिज संपत्तीसाठी यंत्रणेला सोबत घेऊन एकाच ठिकाणच्या डोंगरपरिसराची अनेक भागात विभागणी करुन परवानगीच्या किचकीट प्रक्रियेला पद्धतशीर बगल देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मंजुरीसाठी यंत्रणा कामाला लागली असून उत्खनन झाल्यास सह्याद्री वाघ संवर्धन प्रकल्पच धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पाच हेक्टरपेक्षा कमी जागेतील उत्खननासाठी पर्यावरण विषयक परनवागीच्या तुलनेत कमी अटी आहेत. ती परवानगी मिळवणेही सोपे जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी विविध नावाने कंपन्यांमध्ये जागेची विभागणी केली जाते. घुंगूर येथेही एका जागेची चार भागात विभागणी केली जात आहे. त्यामुळे या तीन ठिकाणी उत्खननाची परवानगीचे सोपस्कार सहजपणे जिल्हा स्तरावरच पूर्ण होऊ शकते. 50 हेक्टरपर्यंच्या खनिज उत्खननास राज्य शासन स्तरावर परवानगी मिळते. तर त्यापुढील परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरण विभागाच्या अत्यंत क्लिस्ट प्रक्रियेतून जावे लागते. ही प्रक्रिया टाळण्यासाठी एकाच गट क्रमांकात फोड करण्याची शक्कल लढवली जात आहे. अशीच फोड करुन सुमारे 150 हेक्टरवर खनिज उत्खननाची परवानगी घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
एकाच जागेची पद्धतशीर विभागणी करुन राज्य शासन स्तरावरच परवानगीचे सोपस्कार पूर्ण केले जाऊ शकते. दहा वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन होणार असे दाखविले असले तरी सुमारे 150 हेक्टर जागेवरील खाणकामासाठीचा एकत्रित मुल्यांकन अभ्यास अहवाल ऑगस्ट 2017 मध्ये उत्खनन परवानगीसाठी सादर केला सादर केला होता. या दहा ठिकाणी 45 वर्षापर्यंत तीन लाखांपासून 81 लाख मेट्रीक टन बॉक्साईडचे उत्खनन होणार असल्याचा अहवाल सांगतो.
उत्खनास परवानगी मागितलेल्या डोंगरसडय़ात सापडणारे बॉक्साईड उच्च दर्जाचे तर आहेच. शिवाय जमिन पातळीपासून अगदी वरच्या स्तरावर सहज आढळणारे आहे. या ठिकाणी किमान 200 वर्षे उत्खनन चालेल असा तज्ञांचा अंदाज आहे. एकदा परवानगीचे सोपस्कार पूर्ण करुन खाणकाम सुरु झाल्यानंतर त्यास परिसरातील आर्थिक उन्नती झाल्याचा आभास निर्माण करुन रोजगार निर्मितीच्या नावाखाली ती रेठता येत असल्याचा अनेक राज्यातील उत्खनाचा अनुभव आहे. याच धर्तीवर शाहूवाडीत खाणकामाचा नव्याने घाट घातला जात असल्यानेच येथील नैसर्गिक पर्यावरण बिघडू शकते.
व्याघ्र प्रकल्प बासनात
कोयना, चांदोलीपासून राधानगरी अभयारण्यापर्यंत पश्चिम घाट माध्यावर सह्याद्री व्याघ्रप्रकल्प वसलेला आहे. चांदोली-कोयना अभयारण्य 1156 हेक्टर तर राधानगरी अभयारण्य 431 हेक्टर आहे. कोयना ते राधानगरी आणि खाली दक्षिणेत तिलारीपर्यंत पश्चिम घाट माथा हा वाघांचा परिक्रम मार्ग आहे. कर्नाटकात पश्चिम घाट माथ्याची रुंदी काही ठिकाणी 100 किलोमिटर इतकी आहे. मात्र महाराष्ट्रात ती चिंचोळी असून काही ठिकाणी फक्त पाच ते दहा किलोमिटर आहे. विशेषता शाहूवाडी परिसरात हा मार्ग मानवी हस्तक्षेपामुळे अधिकच चिंचोळा झाला आहे. वाघांना नैसर्गिक अधिवासातून प्रवास करताना चिंचोळा मार्ग अडचणीचा ठरत आहे. या परिसरात पुन्हा नव्याने खनिकर्मला परवानगी मिळाल्यास व्याघ्र संवर्धन मोहिमेला खो बसेल असे पर्यावरण तज्ञ सांगतात.
पर्यावरण संवर्धन बिघडणार
एकाच परिसरात 10 ठिकाणांची विभागणी करुन सुमारे 150 हेक्टरवरील जागेत 45 वर्षात एक कोटी 95 लाख 84 हजार 934 इतका खनिज साठय़ाचे उत्खनन केले जाण्याची शक्यता आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात इको सेन्सिटिव्ह झोनला खेटुन होणाऱया या खोदाईमुळे सह्याद्रीला जोडणारा डोंगर सडा नामशेष तर होईलच शिवाय त्यामुळे या परिसरात पर्यावरणीय, जैविक व भौतिक अशा अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.