पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा कंदील ः विदेशी पर्यटकांना जास्तीत जास्त संख्येने भारतात येण्याचे आवाहन
वाराणसी / वृत्तसंस्था
‘गंगा विलास’ या जहाजाच्या गंगा प्रवासाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला आहे. त्यांनी शुक्रवारी या प्रवासी नौकेला व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा कंदील दाखविला. या नौकेचा गंगा प्रवास हा जगात सर्वाधिक लांबीचा नदी प्रवास होणार असल्यामुळे ही नौका प्रारंभीच्या प्रवासातच एक विश्वविक्रम करणार आहे. 3 हजार 200 किलोमीटरचा हा प्रवास असेल, अशी माहिती देण्यात आली. नदीतील क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले. वाराणसीच्या रामनगर बंदरावरून ही क्रूझ पुढच्या प्रवासाला रवाना झाली आहे. या क्रूझमध्ये रेस्टॉरंट, सनडेक, जिम, स्पा यासारख्या फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. मात्र, त्यासाठी प्रवाशांना लाखो रुपये मोजावे लागणार आहेत.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भाषण केले. गंगा भारतासाठी केवळ एक जलधारा नाही. भारताच्या संस्कृतीचा हा श्वास आहे. आतापर्यंत गंगेच्या तटवर्ती भागांचा विकास करण्यात आला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. आम्ही ही उणीव भरुन काढण्यासाठी ‘नमामि गंगे’ हा उपक्रम हाती घेतला आहे. विकासाअभावी गंगेच्या तटावरच्या प्रदेशांमधून लाखो लोकांनी इतरत्र पलायन केले. आता तटवर्ती भागांचा विकास झपाटय़ाने करण्यात येत असून लवकरच या भागाचा कायापालट होईल. गंगा विलास ही नौका या विकासाचे प्रतीक आहे. ही नौका विकासाची एक नवी रेषा उमटवत जाणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
छोटय़ा नौकांनाही प्रोत्साहन
गंगा नदीची लांबी मोठी असल्याने ती अनेक राज्यांमधून प्रवास करते. तिच्या मार्गाचा उपयोग लोकांच्या प्रवासासाठी सहस्रावधी वर्षांपासून होत आहे. केंद्र सरकारने आता हा जलमार्ग अधिक प्रमाणात उपयोगात आणण्याचा निर्धार केला आहे. नौका प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी गंगेच्या दोन्ही तटांवर प्रवाशांसाठी सुविधांचे निर्माण कार्य केले जाणार आहे. गंगेवर निर्माण करण्यात येणारा हा राष्ट्रीय जलमार्ग साऱया भारतासाठी एक आदर्श ठरणार आहे. वाहतूक, व्यापार आणि पर्यटन यांच्यासाठी हा मार्ग वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अन्य राज्यांमध्येही जलमार्ग
भारताच्या 24 राज्यांमध्ये 111 जलमार्गांना प्राधान्य देण्याची योजना सज्ज आहे. 2014 पूर्वी जलमार्गांचा उपयोग क्वचितच केला जात असे. जलमार्ग वाहतुकीची मोठी परंपरा भारताला आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळ या परंपरेचा विसर पडला होता. आता आमचे सरकार आल्यानंतर हे दुर्लक्ष दूर करण्यात आले. 2014 मध्ये भारतात केवळ 5 जलमार्ग होते. आज 24 राज्यांमध्ये 111 जलमार्ग विकसीत होत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
गंगा विलासची वैशिष्टय़े
ड गंगा विलासचा प्रवास जगातील सर्वात लांब नदीचा प्रवास
ड प्रवासाचे अंतर 3,200 किलोमीटरचे, अत्याधुनिक सुविधा
ड प्रवासाचे भाडे 19 लाख, एका कक्षाचे भाडे 32 लाख रु.
ड गंगानदीच्या तटावर 30 हेक्टरमध्ये अत्याधुनिक टेंट शहर