शशी थरुर, के. एन. त्रिपाठी आणि मल्लिकार्जुन खर्गे उमेदवार , दिग्विजय सिंग बाहेर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी होणाऱया निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिवशी तीन अर्ज सादर झाले असून याच तीन उमेदवारांमध्ये चुरस दिसणार आहे. केरळमधील खासदार शशी थरुर, कर्नाटकातील नेते आणि राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन खर्गे आणि झारखंडमधील ज्येष्ठ नेते के. एन. त्रिपाठी हे तीन उमेदवार असून यांच्यापैकी कोणी अर्ज मागे घेतला नाही तर हा संघर्ष तिरंगी होणार हे निश्चित झाले आहे. 8 ऑक्टोबर हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम सूची घोषित होणार आहे.
अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वप्रथम शशी थरुर यांनी तो सादर केला. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे आणि नंतर त्रिपाठी रिंगणात आले. थरुर यांनी अर्ज सादर केल्यानंतर गांधी समाधीस्थळी जाऊन दर्शनही घेतले. संध्याकाळी त्यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन धोरण स्पष्ट केले.
सुधारणा हव्या असतील तर…
काँगेसमधील ज्या सदस्यांना सुधारणा हव्या असतील, तर त्यांनी मला मतदान करुन अध्यक्ष बनवावे. जर त्यांना सध्याचीच स्थिती रहावी असे वाटत असेल तर त्यांनी खर्गे यांना विजयी करावे, असे प्रतिपादन करत थरुर यांनी आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. त्यांचे हे विधान खळबळजनक ठरण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांनी गांधी कुटुंब या निवडणुकीत तटस्थ राहील असा शब्द दिला आहे. तो खरा ठरेल अशी आपल्याला आशा आहे, असेही थरुर म्हणाले.
ज्येष्ठांचा खर्गेंना पाठिंबा
काँगेसमधील ज्येष्ठ 23 नेत्यांनी खर्गे यांच्या पाठीशी राहण्याचे संकेत दिले आहेत. याच 23 नेत्यांनी दीड वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून काँगेसला पूर्णवेळ आणि काम करणारा अध्यक्ष असावा अशी मागणी केली होती. हे नेते थरुर यांच्या पाठीशी उभे राहतील अशी शक्यता प्रथम व्यक्त होत होती. तथापि, आता त्यांनी खर्गे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यास काँगेसमध्ये अमूलाग्र सुधारणा करण्यासाठी आपण झटणार आहोत, असे भरघोस आश्वासन मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहे.
शेतकऱयाला संधी द्या
झारखंडमधील नेते के. एन. त्रिपाठी यांनीही उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर आपले विचार व्यक्त केले. आपण शेतकरी आहोत. काँगेसचे अध्यक्षस्थान एका शेतकऱयाला भूषवू देण्याची संधी या निवडणुकीतील मतदार साधतील अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्यापाशी प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे. एक शेतकरी काँगेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत लढू शकतो हे मी सर्वांना दाखवून देणार आहे. मला विजयाची खात्री आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
दिग्विजय, गेहलोत बाहेर
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे गुरुवारीच घोषित केले होते. शुक्रवारी दिग्विजयसिंग यांनीही माघार घेतली. या दोघांनीही अर्ज सादर केलेला नव्हता. पण ते निवडणूक लढवितील अशी दाट शक्यता गुरुवारपर्यंत होती. तथापि ती आता नष्ट झाली आहे.
गांधी कुटुंब नेमके कोणाकडे…
गांधी कुटुंबाने या निवडणुकीत कोणाचीही बाजू न घेण्याचे ठरविलेले असले तरी प्रत्यक्षात तसे केले जाईल काय हा प्रश्न राजकीय अभ्यासक विचारीत आहेत. कर्नाटकात येत्या मे महिन्यात होणाऱया विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून गांधी कुटुंब मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पाठीशी अप्रत्यक्षपणे राहण्याची शक्यता राजकीय व़िश्लेषकांना दिसत आहे. तसे झाल्यास थरुन आणि त्रिपाठी यांना विजयसाठी आकाश-पाताळ एक करावे लागेल, अशी शक्यता आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम
30 सप्टेंबर ः उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस
1 ऑक्टोबर ः सर्व उमेदवारी अर्जांची छाननी
8 ऑक्टोबर ः अर्जमाघारीचा शेवटचा दिवस
8 ऑक्टोबर ः उमेदवार अंतिम सूचीची घोषणा
17 ऑक्टोबर ः काँगेस अध्यक्षपदासाठी मतदान
19 ऑक्टोबर ः मतगणना आणि निर्णय