आजपासून 30 मेपर्यंत सतर्कतेचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारच्या भारत मौसम विज्ञान विभाग आणि हवामानशास्त्र विभाग बेंगळूर यांच्यावतीने आता वादळाच्या शक्यतेचा इशारा देण्यात येत आहे. त्यानुसार दि. 26 मे रोजी रात्री उत्तर कर्नाटकात बेळगाव, गदग, हावेरी, रायचूर व यादगिर जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 कि.मी.वेगाने वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दि. 27, 28, 29 मे दरम्यान पावसाची शक्यता नसून 30 मे रोजी अंतर्गत कर्नाटकातील बागलकोट, बिदर, कलबुर्गी, रायचूर, विजापूर व यादगिर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकाडाटासह वादळ पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान पावसाळ्यामध्ये वीज पडून जीवितहानी टाळण्यासाठी भूविज्ञान व तंत्रज्ञान विभागाने ‘दामिनी’ हे ऍप विकसित केले आहे. वीज पडण्यापूर्वी 15 मिनिटे आधी नागरिकांना प्रामुख्याने शेतकरी व मजुरांना पूर्वसूचना मिळेल आणि त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होता येईल. हवामान खाते पाऊस आणि हवामानाबाबत नेहमी अंदाज व्यक्त करते. परंतु दरवेळी ते अचुकच असतात, असे नाही. म्हणूनच भूविज्ञान विभागाने दामिनी हे ऍप विकसित केले आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी या ऍपची माहिती देऊन ते डाऊनलोड करून घेण्याची सूचना केली आहे. याशिवाय या ऍपमध्ये अन्य महत्त्वाच्या सूचनाही आहेत.
त्या म्हणजे
- पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श करणार नाही, याची काळजी घ्या.
- नदी, विहीर किंवा तलावात पोहत असणाऱ्यांनी किंवा पाण्याच्या संपर्कात असणाऱ्यांनी त्वरित बाहेर पडावे.
- मासेमारी करू नये
- कोणत्याही झाडाखाली थांबू नये
- शक्य असल्यास घरावर वीज वाहक यंत्रणा बसवून घ्यावी
- खुल्या मैदानात उभे राहू नये. तसेच वृक्ष, दलदल यापासून दूर रहावे.
- विजेचे खांब, दूरध्वनीचे खांब, टॉवर यांच्याजवळ उभे राहू नये.
- छत्री असल्यास त्याच्या धातूच्या दांडीमुळे विजेचा संपर्क येवू शकतो. त्यामुळे अशी छत्री वापरू नये.
- पाण्याचा नळ, फ्रीज, दूरध्वनी, टीव्हीचा सेटअपबॉक्स, मोबाईल यांचा संपर्क टाळावा.