वर्ष उलटले तरी मागण्यांकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासह इतर विविध मागण्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केल्या होत्या. मात्र वर्ष उलटले तरी अद्याप या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संप पुकारण्याच्या मार्गावर कर्मचारी आहेत.
गतवर्षी परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे बससेवा ठप्प झाली होती. त्यामुळे परिवहनला मोठा तोटा सहन करावा लागला होता. दरम्यान सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आंदोलन निवळले होते. मात्र एका वर्षानंतरदेखील मागण्या मान्य न झाल्याने कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे पुन्हा संप पुकारल्यास परिवहनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले होते. तब्बल पंधरा दिवसांहून अधिक काळ बससेवा बंद होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. शिवाय परिवहनला आर्थिकदृष्ट्या फटका बसला होता. परिवहन कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, सरकारी नोकराप्रमाणे सोयी-सुविधा पुरवाव्यात, सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ करावी. वैद्यकीय सुविधा द्याव्यात, निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.