बोरीतील शिवमराठी साहित्य संमेलनात लीला शिंदे यांचे उद्गार
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
गोमंतभूषण पद्मश्री बा. भ. बोरकर यांची काव्यसंपदा आजही जनसामान्याच्या मनात घर करुन आहे. बोरकरांच्या कवितेतला निसर्ग, डोंगर, नद्या, समुद्र, शेती, माती, खेडीपाडी ही समृद्धी कवी व साहित्यप्रेमींनी मनमुराद अनुभवली. मात्र आज गोव्यासह संपूर्ण भारतातील निसर्ग छिन्नविच्छीन्न झालेला आहे. आपण सगळेच निसर्गाशी एकरुप होऊन जगत आहोत. मात्र मानवी जीवन समृद्ध करणाऱया निसर्गाचाच गळा घोटण्याचे कृत्य माणसाच्या हातून घडताना दिसते. संवेदशनशील माणसासाठी ही वेदनादायी बाब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका लीला शिंदे यांनी केले.
बोरी येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय शिवमराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळयात अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. डॉ. शिवरचण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर, जळगाव आणि प्रागतिक विचारमंच गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी बोरीच्या श्री नवदुर्गा सभागृहात हे एकदिवशी संमेलन भरविण्यात आले. पद्मश्री बा. भ. बोरकर नगरी व स्व. पुष्पाग्रज तथा अशोक नाईक तुयेकर व्यासपीठावरुन त्या बोलत होत्या. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वसकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. कार्याध्यक्ष सुनिल सावकार, संयोजक प्रकाश तळवडेकर, निमंत्रक अजितसिंग राणे, प्रमुख अतिथी स्वातंत्र्यसैनिक रोहिदास नाईक, विशेष अतिथी डॉ. श्रीकांत पाटील, सतीश तराळ, जयंत मिरींगकर, डॉ. शोभा रोडे, डॉ. प्रतिमा इंगोले, प्रमोद चिवटे, डॉ. शिवचरण उज्जैनकर व अन्य मान्यवरांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
निला शिंदे पुढे म्हणाल्या, बालशिक्षणाला प्राधान्य मिळाले पाहिजे व कौटुंबीक नाती टिकली पाहिजेत. बालसाहित्याचे प्रमाण वाढणे गरजेचे असून मुलांना भावनिक, मानसिक समुपदेशन मिळायला हवे. तसेच संस्कारक्षम शिक्षणाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक युवक हा सक्षम, समर्थ आणि विवेकशील असावा. साहित्याच्या माध्यामातून समाजामध्ये चैतन्य पसरले पाहिजे असे त्यांनी नमूद केले.
रमेश वंसकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलीत करुन संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. साहित्याच्या अधिकृत प्रसारासाठी संबंधीत संस्थानी पुढे आले पाहिजे. गोमंतकीय साहित्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे रमेश वंसकर म्हणाले. यावेळी लीला शिंदे, रमेश वंसकर, जयंत मिरींगकर, सुनिल सावकर, जयवंत आडपईकर, प्रकाश तळवडेकर, डॉ. शिवचरण उज्जैनकर, संगीता उज्जैनकर, डॉ. सतीश तराळ, डॉ. प्रतिमा इंगोले, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. शोभा रोकडे, अजितसिंग राणे, डॉ. अनिता तिळवे, डॉ. प्रमोद चिवटे आदींचा सत्कार करण्यात आला. प्रसाद सावंत आणि साथी कलाकारांनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जयंत मिरींगकर यांनी स्वागत तर जयवंत आडपईकर यांनी प्रास्ताविक केले. दुर्गाकुमार नावती यांनी सूत्रसंचालन व प्रमोद पिवटे यांनी आभार मानले.