मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सीमाभागातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच निवृत्तीवेतन

प्रतिनिधी /मुंबई
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा- प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमाभागातील बांधवांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमाभागातील बांधवांना प्रभावीपणे होण्यासाठी सीमाप्रश्न हाताळणाऱया विशेष कक्षाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ पूर्वीप्रमाणे सीमाभागात देण्याचा तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभदेखील सीमाभागातील बांधवांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर गठीत उच्चस्तरीय समितीची बैठक सोमवारी मुंबईत सहय़ाद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव, इतर अधिकारी, विधीज्ञ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते.
सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रस्ताविक केले. ऍड. शिवाजी जाधव यांनी सीमा प्रश्नासंदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाई संदर्भात माहिती दिली.
सीमा प्रश्न सोडविण्यासाठी गांभीर्याने लक्ष
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सीमाप्रश्नी त्याभागातील बांधवांच्या नेहमी पाठीशी राहिले आहेत, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सीमाप्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन गांभीर्याने लक्ष घालत आहे. त्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन यांची नेमणूक करण्यात आली आहे. गरज भासल्यास विधीज्ञांची संख्या वाढविण्यात येईल. राज्य शासनाने संपूर्ण लक्ष याप्रश्नावर केंद्रीत केले आहे. त्याचबरोबर आपण स्वतः तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस याप्रश्नासंदर्भात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांची लवकरच भेट घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विशेष कक्षाचेही बळकटीकरण करणार
सीमाभागातील बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सीमाप्रश्न हाताळणाऱया विशेष कक्षाचे बळकटीकरण करण्याचे निर्देशही दिले आहेत. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सुविधांसाठी कर्नाटकसोबत संवाद सुरू ठेवा
न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरी सीमाभागात मराठी भाषेचा वापर, त्या भागातील बांधवांना आवश्यक त्या सुविधा याबाबत कर्नाटक सरकार सोबत संवाद सुरू ठेवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आंदोलनातील हुतात्म्यांना निवृत्तीवेतन
सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यायालयीन लढाईसाठी एकीकरण समितीने अदा केलेल्या शुल्काच्या प्रतिपूर्तीचा निर्णयही घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विविध विषयावर विस्तृत चर्चा
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या दाव्याच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींवर चर्चा, राजकीय पातळीवर प्रयत्न, मराठी भाषिकांचे तातडीने सोडवायचे प्रश्न आणि त्यासाठी तातडीने करावयाच्या बाबी इत्यादींवर विस्तृत चर्चा झाली आहे. राज्य सरकारचे या सर्व प्रयत्नांना भक्कम सहकार्य असेल, असे आश्वासन देण्यात आले. कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी धर्मादाय निधी, वैद्यकीय सहायता कक्षाचा निधी, मंत्र्यांची नियुक्ती, वेळोवेळी प्रश्न सोडवण्यासाठी समर्पित कक्ष असे अनेक विषय तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सनदशीर मार्गाने सीमा प्रश्न सोडवू : उपमुख्यमंत्री
सीमा प्रश्न अत्यंत जिव्हाळय़ाचा विषय आहे. याप्रश्नी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आहेत. सनदशीर, लोकशाही मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही सर्वजण सीमावासीयांबरोबर आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उपस्थितांनी मांडली मते
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, दिनेश ओऊळकर, विनोद आंबेवाडकर यांनी सीमाभागातील समस्यांची माहिती दिली. ज्येष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती केल्याबद्दल समितीच्या सदस्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.