वृत्तसंस्था /भोपाळ
येथील मध्यप्रदेश राज्याच्या नेमबाजी अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक एअर पिस्तुल नेमबाजीत भारताच्या नेमबाजांनी गुरुवारी मिश्र सांघिक प्रकारात एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय नेमबाज सरबज्योत सिंगने वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळविले होते. या स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदकांची कमाई केली आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदकासाठी झालेल्या फेरीत भारताच्या वरुण तोमर आणि ऱिहदम सांगवान यांना चीनच्या वेई क्मयुयान व जिनाओ लियु यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. चीनच्या या जोडीने भारताच्या वरुण आणि ऱिहदम यांचा 17-11 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे तोमर आणि सांगवान यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. वरुण तोमरचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. बुधवारी वरुणने पुरुषांच्या एअर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक मिळविले होते.गुरुवारी झालेल्या पुरुषांच्या मिश्र सांघिक एअर रायफल नेमबाजीमध्ये भारताचा विश्वविजेता रुद्रांक्ष पाटील आणि त्याची साथीदार नर्मदा राजू यांना कांस्यपदक मिळाले. चीनच्या झेंग आणि यु यांनी पाटील व नर्मदा राजू यांचा 16-8 अशा गुणांनी पराभव केला. या प्रकारात चीनच्या हुवांग आणि शेंग यांनी सुवर्णपदक पटकाविले. हुवांग आणि शेंग यांनी सुवर्णपदकासाठीच्या लढतीत हंगेरीच्या डेनिस व पेनी यांचा 16-2 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेत दुसऱया दिवसाअखेर चीनने पदकतक्त्यात पहिले स्थान मिळवताना 3 सुवर्ण आणि 2 कांस्यपदके मिळविली आहेत. भारत दुसऱया स्थानावर असून त्यांनी 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली आहे.