पालकमंत्र्यांची आढावा बैठकीत माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारने राबविलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या लाभार्थींशी केंद्रीयमंत्री सोमप्रकाश हे सोमवार दि. 27 जून रोजी संवाद साधणार आहेत. दुसऱया दिवशी 28 जून रोजी ते विविध ठिकाणी भेट देणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
गुरुवारी सरकारी विश्रामधाम येथे अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी विकासकामांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मुद्रा योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी, एक देश एक रेशनकार्ड, स्वनिधी योजना, गरीब कल्याण आदी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थींशी केंद्रीयमंत्री संवाद साधणार आहेत, अशी माहिती या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिली.
लाभार्थींशी चर्चा केल्यानंतर ते योजनांचा आढावा घेणार आहेत. दुसऱया दिवशी 28 जून रोजी बेळगाव येथील भुईकोट किल्ला, रेशन दुकान, बिम्स् येथील जनऔषधी केंद्राला ते भेट देणार आहेत. अगसगे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अमृत सरोवर योजनेच्या कामांची व कडोली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या उद्योग खात्रीतील कामांची पाहणी करणार आहेत.
या बैठकीत पालकमंत्र्यांनी केंद्रीय योजनांविषयी माहिती घेतली. अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी जारी करण्यात आलेल्या योजनांचाही परिचय माहिती पुस्तकात द्यावा. लाभार्थींची निवड करताना सर्वसमावेशक निवड करावी, अशा सूचना अधिकाऱयांना देण्यात आल्या. सोमवार दि. 27 जून रोजी सकाळी 10.30 वाजता सुवर्ण विधानसौध येथे केंद्रीयमंत्री सोमप्रकाश हे लाभार्थींशी संवाद साधणार आहेत.
या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., मनपा आयुक्त रुदेश घाळी, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक डॉ. प्रवीण बागेवाडी, जिल्हा नगरविकास कोषचे ईश्वर उळागड्डी, कृषी खात्याचे डॉ. एच. डी. कोळेकर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
‘त्या’ 22 मुलांशीही साधणार संवाद
कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या जिल्हय़ातील 22 मुलांना पीएम केअर्स निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. या मुलांनाही कार्यक्रमांना बोलाविण्यात आले असून केंद्रीयमंत्री त्यांच्याशीही संवाद साधणार आहेत.