विजय जाधव -गोडोली
जिल्ह्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायतीचे उपसरपंच निवड प्रक्रिया दि.१०, ११,१२ जानेवारी दरम्यान होणार आहे. आताचं उपसरपंच निवडीच्या हालचाली सुरू झाल्या असून यात सरपंच हे ग्रामपंचायतीचे पद सिध्द सदस्य म्हणून उपसरपंच निवड प्रक्रियेत एक मत देणार आहेत.तर अधिनियमातील नव्या सुधारीत तरतुदीमुळे उपसरपंच निवडीच्या वेळी समसमान मत पडल्यानंतर निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंचाना असणार असून आधी एक आणि समसमान तरचं दुसरे मत देता येणार आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३३ अंतर्गत उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडते.जिल्ह्यात ददि.१० ते १२ जानेवारी दरम्यान उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. हि निवड करण्याची ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३३ नुसार सरपंचाच्या अध्यक्षतेखाली असून त्याची संपूर्ण कार्यवाही तेच पार पाडणार आहे.तसेच यात अधिक सुधारणा दि.५ मार्च २०२० आणि दि.२७ जुलै २०२२ च्या अधिसूचनेत याबाबत स्पष्ट केल्या आहेत.
उपसरपंच पदाच्या निवडणूक करताना पहिल्या फेरीत सरपंच यांना पदसिद्ध सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार असणार आहे.जर सदर निवडणूकीमध्ये समसमान मते पडल्यास यावेळी सरपंचाना निर्णायक मत देण्याचा कायदेशीर हक्क देण्यात आला आहे.
याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली असून उपसरपंच निवड करताना एकाच व्यक्तीला दोन वेळा मतदान करण्याचा अधिकार असलेली देशातील हि निवड प्रक्रिया आहे. उपसरपंचाची निवडणूक ही सरपंचांचे कर्तव्य असून अधिनियमातील तरतुदीनुसार बंधनकारक आहे. उपसरपंच पदाची निवडणूकीची सभा तहकुब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम १२ मधील तरतुदीनुसार सदरची सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तात्काळ घ्यावी लागते. उपसरपंचाच्या निवडणूकीकरीता अपरिहार्य कारणास्तव सरपंच उपस्थित राहण्यास असमर्थ असतील तर जिल्हाधिकारी यांनी सदर कारणाची खातरजमा करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम ३३ मधील पोट कलम ६ (४) मधील तरतुदीस अनुसरुन तात्काळ पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करावी.अशा वेळी कर्तव्यात कसूर केली असे समजून सरपंचावर अपात्रतेची कारवाई अटळ आहे.