पायीदिंडी काही दिवसांवर : विठ्ठलाच्या दर्शनाची भक्तांना आस
प्रतिनिधी / बेळगाव
‘भेटीलागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’ अशी अवस्था भक्तांची झाली आहे. आषाढी पायीदिंडी पालखी सोहळा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पायीदिंडी सोहळ्याची आस लागली आहे. वर्षानुवर्षे अखंड चालणाऱ्या वारीला कोरोनाचा ब्रेक लागला होता. मात्र, गतवर्षापासून ही पायीदिंडी पूर्ववतपणे सुरू झाली आहे. दरम्यान, सासुरवाशिणीला जशी माहेरची ओढ लागावी, तशी वारकऱ्यांना आता पायीदिंडीची ओढ लागली आहे. कार्तिक आषाढी एकादशीला गावागावांतून पायीदिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. यंदाही आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी बेळगाव परिसरातून साधारण 15 ते 20 दिंड्या मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे दिंडीच्या तयारीत वारकरी गुंतले आहेत. कोरोनामुळे 2020 आणि 2021 सालात पंढरीच्या आषाढी वारीत खंड पडला होता. मात्र, गतवर्षीपासून हा दिंडी सोहळा पूर्ववतपणे सुरू झाला आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेळगाव परिसरातून वारकरी महासंघ बेळगाव, कंग्राळी खुर्द, सुळगा, कणबर्गी, निलजी, आंबेवाडी, पिरनवाडी, बसवन कुडची, येळ्ळूर, कडोली, सांबरा, अष्टे, मास्तमर्डी आदी गावांतून दिंड्या मार्गस्थ होणार आहेत. या प्रत्येक दिंडीला पाच ते तीस वर्षांची परंपरा असून दहा ते पंधरा दिवस हा पायी प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू असतो. पायी प्रवासादरम्यान सन्मार्ग, महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, सुखी संसाराचा मंत्र दिला जातो. या प्रत्येक दिंडीत दीडशे ते अडीचशे वारकरी हातात पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात भजनात तल्लीन होऊन सहभागी होतात. कोरोना काळात दोन वर्षे एकादशीचा सोहळा केवळ प्रतिकात्मक रूपात साजरा झाला होता. दरम्यान, वारकऱ्यांना वारी आणि दिंडी यापासून दूर राहावे लागले होते. मात्र, गतवर्षीपासून वारी आणि दिंडी सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा वारकऱ्यांना दिंडीत सहभागी होता येत आहे. बेळगाव परिसरातून दिंड्या पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून भुतरामहट्टी, चिकालगु•, जैनापूर, अंकली, म्हैसाळ, यल्लम्मादेवी मंदिर भोसे, अंबळगाव, शेळकेवाडी, हत्तीद, कासेगावमार्गे पंढरपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, ज्ञानेश्वर माऊलींच्या मुख्य दिंडीत या दिंड्या सहभागी होणार आहेत. काही गावांतील वारकरी मंडळी आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या मुख्य दिंड्यांमध्ये सहभागी होणार आहेत.
दिंडीच्या माध्यमातून भक्ती
निलजी येथून येत्या 15 जून रोजी पायीदिंडीचे प्रस्थान होणार आहे. त्यामुळे उत्साह वाढला आहे. जसे भगवंताचे दर्शन घेण्यासाठी तळमळ सुरू आहे, तशी भगवंतालाही भक्तांच्या भेटीची आस लागली आहे. दिंडीच्या माध्यमातून भक्तीमार्गाची तयारी सुरू असल्याचे निलजी येथील गोविंद महाराजांनी सांगितले.