अनुजा कुडतरकर–
प्रत्येक गावाची काही ना काही वेगळी खासियत असते. तशीच वेगळी खासियत या गावाची देखील आहे. हे गाव ओळखलं जातं ते तेथील सैनिकी परंपरेमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही सैनिकी परंपरा सुरु आहे. व आजही जवळपास इथल्या साठ टक्के घरात सैनिकी पेशा असणारे लोक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ हे खरं तर दुर्गम असं गाव.आंबोली पासून ७ किमी अंतरावर हे गाव आहे .पण, इथल्या नैसर्गिक वातावरणामुळे व सैनिकी परंपरा या गावाला लाभल्यामुळे हे गाव नेहमीच प्रकाशझोतात असतं. पावसाळ्यात प्रचंड पडणारा पाऊस… त्यामुळे इथली भूमी आपल्या अंगावर जणू हिरवळीची शालच पांघरते असा भास झाल्याशिवाय राहत नाही. हिवाळ्यात पडणाऱ्या दाट धुक्यात हे गाव हरवून जातं. या गावात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते .या गावात एकूण १३ वाड्या आहेत. सभोवताली पसरलेलं मोकळं मैदान, दाट वनराई , वन्य प्राण्यांचा असणारा वावर ,करवंदाची झाडं अशी नैसर्गिक रचना इथे पाहायला मिळते. चौकुळ हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने एक उत्तम असं गाव आहे. ज्यांना भटकंती करायचीय त्यांच्यासाठी हे ठिकाण एक उत्तम स्पॉट ठरू शकतो .विविध ठिकाणचे ट्रेकर्स या ठिकाणाला अवश्य भेट देतात. या गावात विविध गुहा पाहायला मिळतात . या अद्भुत अशा गुहांना लोक आवर्जून भेट देतात. इथल्या मोकळ्या जमिनीवर विविध रंगाची फुलं , पाहायला मिळतात. ही फुलं पर्यटकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.
या गावातील सैनिकांनी आपल्या भारत देशासाठी बहुमोल योगदान दिलय. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दीपक गावडे हे जवान शहीद झाले होते . तसेच अनेक जवान आहेत ज्यांनी देशसेवेसाठी मरणालाही कवटाळलंय. दुर्गम असं गाव असून देखील इथला तरुण सैनिकी पेशात करिअर करण्याचे स्वप्न काल पाहत होता आणि आजदेखील पाहत आहे.भलेही मरण जवळ करावं लागलं तरी इथला सैनिक निधड्या छातीने शेवटपर्यत लढतच राहतो. असं हे चौकुळ गाव कर्तृत्वाचे एक एक किस्से सांगत दिमाखात उभं आहे.