चांगल्या दर्जाचे व्हॉल्व बसविण्याकडे एल ऍण्ड टीचे दुर्लक्ष : गणपत गल्ली परिसरातील समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध भागात गळत्यांद्वारे सातत्याने पाणी वाया जात आहे. विशेषतः शनिवार खूट परिसरात गणपत गल्ली कॉर्नरजवळील व्हॉल्व खराब झाल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. या ठिकाणी बसविलेला व्हॉल्व काही महिन्यातच खराब होत असून गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी वाया जात आहे. गणपत गल्ली परिसरात पाणी वाहत असल्याने व्यावसायिकांना आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गणपत गल्ली कॉर्नर परिसरात दोन व्हॉल्व असून याद्वारे विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. राणी चन्नम्मा चौकातून थेट जलवाहिनी असल्याने पाणीपुरवठा करताना या व्हॉल्ववर ताण वाढत आहे. परिणामी काही महिन्यातच येथील व्हॉल्व खराब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सतत पाणी वाया जात असते. व्हॉल्व खराब झाल्यानंतर दुरुस्त करण्यासाठी महिना-दीड महिन्याचा अवधी जातो. या दरम्यान पाणी वाया जात असते. त्यामुळे काही भागात मुबलक पाणी मिळत नाही. गळतीद्वारे हे पाणी गणपत गल्लीत वाहत असून रस्त्यावर पाणी साचून रहात आहे. ये-जा करणाऱया वाहनांमुळे साचलेले पाणी परिसरातील फेरीवाले तसेच पादचाऱयांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे नागरिकांनादेखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अत्याधुनिक पद्धतीची यंत्रोपकरणे वापरण्यात येत असतात. विशेषतः चांगल्या दर्जाचे साहित्य वापरले जाते मात्र या ठिकाणी सातत्याने गळती होऊनदेखील चांगल्या दर्जाचे व्हॉल्व का बसविले जात नाहीत असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
प्रत्येकवेळी व्हॉल्वच्या दुरुस्तीसाठी हजारो रुपये खर्ची घातले जातात. त्यामुळे जाणीवपूर्वक निकृष्ट पद्धतीचे व्हॉल्व बसविण्यात येत आहेत का? असा मुद्दा नागरिक उपस्थित करीत आहेत. परिसरातील वाहणारे पाणी वाया जात असल्याने पाणी बचतीसाठी आणि वारंवार करण्यात येणाऱया खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी चांगल्या पद्धतीचे व्हॉल्व बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.