प्रतिनिधी /पेडणे
धारगळ पंचायतक्षेत्रातील दाडाचीवाडी या परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून नळांना पाणी येत नाही. आणि यावर योग्य ती उपाययोजना सार्वजनिक बांधकाम खाते पाणी विभागाकडून होत नसल्याने स्थानिक नागरिक व युवकांनी नाराजी व्यक्त करून दाडाचीवाडी धारगळ येथील श्री हनुमान मंदिर जवळील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला खोदकाम करून जलवाहिनी टाकून इतरत्र पाणी वळविण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी हे काम बंद पाडले.
घटनास्थळी धारगळ सरपंच भूषण नाईक उपस्थित राहून जोपर्यंत कंत्राटदार कागदपत्रे सादर करत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे व नंतरच काम सुरू करावे अशी सूचना केली.
सविस्तर माहितीनुसार दाडाचीवाडी धारगळ येथील स्थानिक नागरिकांना नळाचे पाणी वेळेवर येत नाही तर दुसऱया बाजूने धारगळ येथे होऊ घातलेल्या वेगवेगळय़ा प्रकल्पासाठी पाणी वळविण्याचा प्रयत्न जलसिंचन खाते आणि पाणी विभागाकडून होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते ते बंद पाडले. जोपर्यंत स्थानिकांना वेळेवर पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणी इतर प्रकल्पांना देऊ नये, असा निर्धार नागरिकांनी केला. घटनास्थळी पोलिसांसमक्ष सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक तसेच नागरिक उपस्थित झाले. येथील नागरिकांचे म्हणणे आहे आम्हाला मागच्या कित्येक दिवसापासून नळांना पाणी वेळेवर येत नाही. पाणी निदान दिवसाआड तरी पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करत सरकारकडून नवीन जलवाहिन्या घालून जे धारगळ पंचायतक्षेत्रात मोठ-मोठे प्रकल्प होऊ घातले आहेत त्या प्रकल्पांना पाणी वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त करून टाकीजवळ जी मोठी जलवाहिनी घालण्यासाठी मधोमध रस्ते खोदण्याचे काम सुरू होते ते काम बंद केले.
यावेळी धारगळ सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक यांनी सांगितले की जर सार्वजनिक बांधकाम खाते पाणी विभागाकडून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असेल तर त्याची कागदपत्रे कायदेशीर कंत्राटदाराजवळ असणे आवश्यक होते. आपण सरपंच या नात्याने ज्याठिकाणी काम सुरू होते त्याठिकाणी कंत्राटदाराकडून कागदपत्रांची मागणी केली. शिवाय सार्वजनिक बांधकाम खाते पाणी विभाग अभियंत्याला घटनास्थळी बोलण्याची विनंती केली. परंतु संबंधित अधिकारी कुठेतरी बाहेर गेल्याने तो घटनास्थळी पोहोचला नाही. त्यामुळे आपण सरपंच या नात्याने जोपर्यंत कागदपत्रे काम करण्याचा परवाना असेल की नसेल याची कागदपत्रे जोपर्यंत पंचायतीत कंत्राटदार सादर करणार नाही तोपर्यंत कंत्राटदाराने काम बंद ठेवावे आणि अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला अशी माहिती सरपंच भूषण नाईक यांनी दिली.