दारुच्या पाटर्य़ा करून धिंगाणा घालण्याचे प्रकार : धार्मिक स्थळाचे पावित्र्य भंग होत असल्याने देवस्थान समितीने घेतला निर्णय
वार्ताहर /लाटंबार्से –
लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील लाडफे गावात पावसाळय़ात प्रवाहित होणाऱया धबधब्यावर सध्या पर्यटक मोठय़ा संख्येने मौजमजा करण्यासाठी येतात व दारू पाटर्य़ा करून वाटेलतसा धिंगाणा घालत आहे. यामुळे स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे. याठिकाणी धार्मिक स्थळ असल्याने तेथील पावित्र्य भंग होऊ नये. त्यासाठी लाडफेतील सातेरी केलबाई देवस्थान व लाडफे ग्रामस्थांनी येथील धबधबा पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
धार्मिक स्थळाचे पावित्र्य होते भंग
लाडफे हा निसर्ग सौंदर्याने नटलेला गाव. या गावचे नैसर्गिक वैभव मनाला भुरळ टाकणारे असेच आहे. या गावात असलेल्या धबधब्याला दरवषी पावसाळय़ात बहर येतो. नागमोडय़ा वाटेतून वाहत येणाऱया पाण्याचा निर्माण होणारा धबधबा मनाला सुखद आनंद देऊन जातो. या धबधब्याची भुरळ पडणाऱया अनेकांनी गेल्या काही वर्षांपासून या जागेची निवड वर्षा पर्यटनासाठी केली आहे. मोठय़ा संख्येने गावाबाहेरील युवकांचे समूह या धबधब्यावर सहलीसाठी येतात. मात्र ते येताना दारू, बियर, चिकन मटण सारखे पदार्थ घेऊन येतात. त्यामुळे या स्थळाचे पावित्र्य भंग होत आहे, अशी भावना सातेरी केळबाई देवस्थान आणि गावातील लोकांनी व्यक्त करून या धबधब्यावर जाण्यारी वाटच रोखली आहे.
बेशिस्त वर्तनामुळे घ्यावा लागला निर्णय
देवस्थान समितीचे अध्यक्ष विष्णू मलिक व इतरांनी या धबधब्यावर जाणारी वाट झाडे घालून अडवली आहे. सध्या या धबधब्याच्या स्थळाला ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. सहलीसाठी येणारे युवक व लोक सोबत घेवून येणाऱया बियरच्या व दारूच्या बाटल्या उघडय़ावरच फेकून देतात. खाण्यासाठी आणलेले सामनाही धबधब्यावर च फेकून देण्यात आल्याने जागोजागी कचरा पसरला आहे. अशा या वातावरणात दारूच्या नशेत दंगामस्ती करताना कोणाचेही भांडण झाल्यास गावाच्या नावाला गालबोट लागते. गावातील वातावरणही या बेशिस्त पर्यटनामुळे दूषित होत आहे. त्यासाठीच हा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे विष्णू मलिक, यशवंत मलिक, संजू मलिक, आत्माराम मलिक, नितीन मलिक, नरेश मलिक यांच्यासह गावातील ग्रामस्थानी सांगितले आहे.
लाडफे येथील कळस कोंडीवरील वाहणारा धबधबा हा धार्मिक स्थळ असून त्याठिकाणी देवांच्या मूर्ती विसर्जित केल्या आहेत आणि त्या ठिकाणचे तीर्थ धार्मिक सणाच्या दिवशी गावात कळस फिरून घरोघरी पूजाअर्चा करून दिले जाते. या धबधब्याचा भागात राखणदाराचे स्थळ असून त्याला अस्वच्छता चालत नाही. अशा या धार्मिक ठिकाणी पावसाळय़ात लोक येवून दारूच्या बाटल्या आणि कचरा टाकून मौजमजा आणि दंगामस्ती करून पाणी दूषित करतात, अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल. हे ठिकाण पर्यटन स्थळ नसून धार्मिक पवित्र स्थान आहे असे श्री सातेरी केळबाई देवस्थानचे अधयक्ष विष्णू मलिक यांनी सांगितले.