ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे. कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने काम केलं तर विधानसभेत 200 पेक्षा जास्त आणि लोकसभेला 40 जागा निवडून येतील, असा विश्वास खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला.
राऊत म्हणाले, कसबा काय आणि चिंचवड काय दोन्ही निवडणुकांनी भाजप आणि बंडखोरांना धडा शिकवला आहे. चिंचवडचा विजय हा भाजपचा विजय आहे, हे कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून जगताप पॅटर्न चालतो. हा विजय जगताप पॅटर्नचा आहे. जर राहुल कलाटेंनी माघार घेतली असती तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता.
दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेचं दर्शन, प्रदर्शन, विकृती पाहायला मिळाली. पण मतदारांनी सत्ताधाऱयांना चपराक लगावली. पुणेकर अभिनंदनास पात्र आहेत. ते कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत. जनतेने धनशक्ती लाथाडली. कसबा ही सुरुवात आहे. यावेळी ‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, असं म्हणत राऊत यांनी शिंदे गटालाही डिवचलं.
अधिक वाचा : देशात बदलाचे वारे तयार होतेय..