राजकीय सूडबुद्धीने कारवाई; तृणमूलचा आरोप
ऑनलाईन टीम/तरुण भारत
पश्चिम बंगालशी संबंधित १३०० कोटींच्या कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआयचे एक पथक आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांचे पुतणे आणि टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्या दक्षिण कोलकाता येथील घरी पोहोचले. या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची टीम अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी (rujira banerjee) यांची चौकशी करत आहे. आतापर्यंतच्या तपासात १३०० कोटी रुपयांचे काळ्या पैशाचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. यातील मोठा हिस्सा राज्यातील बड्या लोकांच्या विदेशी बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला आ हे.
याप्रकरणी अभिषेक आणि रुजिरा यांची यापूर्वीच चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवेदनात तफावत आढळून आल्यानंतर नव्याने चौकशी करण्यात येत आहे. हा घोटाळा बंगालमधील कथित कोळसा चोरीशी संबंधित आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) यापूर्वी बॅनर्जी दाम्पत्याची चौकशी केली आहे. या घोटाळ्याची सीबीआय आणि ईडीकडून दीर्घकाळ चौकशी सुरू आहे. यापूर्वी मार्चमध्ये ईडीने तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची दिल्लीत आठ तास चौकशी केली होती. मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत बॅनर्जी यांचे जबाब ईडीने नोंदवले होते आणि काही पुरावेही त्यांच्यासमोर तपासकर्त्यांनी सादर केले होते.
तपास पथकात महिला अधिकाऱ्यांचाही समावेश
बॅनर्जी यांच्या घरी पोहोचलेल्या सीबीआयच्या आठ सदस्यीय टीममध्ये एक महिला अधिकारीही आहे. सीबीआयचे पथक मंगळवारी सकाळी ११.३० वाजता कोलकाता येथील हरीश मुखर्जी मार्गावरील बॅनर्जी यांच्या ‘शांतीनिकेतन’ या निवासस्थानी पोहोचले. अभिषेक बॅनर्जी त्रिपुराच्या दौऱ्यावर असल्याचे बोलले जात आहे. रुजिरा यांची सीबीआय दुसऱ्यांदा चौकशी करत आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रुजिरा यांची चौकशी करण्यात आली होती. याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी त्यांच्या घरी आल्या होत्या. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आधीच्या चौकशीवर आम्ही समाधानी नव्हतो, त्यामुळे आम्ही पुन्हा चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय सूडबुद्धीने कारवाई : तृणमूल
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) रुजिरा बॅनर्जीची सीबीआयची चौकशी ही राजकीय सूडबुद्धीची कृती असल्याचे म्हटले आहे. टीएमसीने ट्विट करून म्हटले आहे की, ‘केंद्राचा राजकीय सूड लज्जास्पद आहे! आमचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आगरतळा येथे पोहोचताच, रिमोट ऑपरेटेड सीबीआयने कारवाई केली. भाजपची भीती स्पष्ट आहे, पण आम्ही झुकणार नाही.