मुंबई : विरोधकांनी अलिकडे बेळगाव सीमाप्रश्न आणि राज्यातील उद्योग बाहेर जाण्याच्या विषयावरून राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे. यामधून विरोधकांचे सत्ता गेल्याचे वैफल्य दिसून येत आहे. हातात काहीच मुद्दे नसल्याने विरोधकांनी जनतेची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. त्यावेळी आणि मविआ सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात सत्तेची सूत्रे अप्रत्यक्षरित्या हाती असताना सीमाप्रश्न मार्गी लावण्यासाठी पवारांनी काय केले?, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उपस्थित केला आहे.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे म्हणाले, राज्यातील एकही इंच जमीन कर्नाटकच काय कुठल्याही अन्य राज्याला कदापि दिली जाणार नाही, अशी भाजपाची ठाम भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे, असे असतानाही विरोधकांकडून टीका होत आहे.
अधिक वाचा : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात साधारण थंडी; कोकणात तुरळक पावसाची शक्यता
नाहक भ्रमनिर्मितीचा केविलवाणा प्रयत्न
भाजपाशी विश्वासघात करुन महाराष्ट्रात स्थापन केलेली सत्ता हातातून गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता सर्रासपणे जनतेच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा उद्योग सुरु केला आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर जहरी टीका काँग्रेसकडून होत असताना उद्धव ठाकरे मूग गिळून बसले. सावरकरांवर खोटीनाटी टीका करणाऱ्या राहुलबाबांची आदित्य ठाकरे यांनी गळाभेट घेतली. यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याचे दिसत आहे, असेही राणे म्हणाले.