मंत्री शंभूराज देसाई यांचा भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल
प्रतिनिधी/ नवारस्ता
गेल्या 15 वर्षांत ज्या वाचाळवीरांनी इकडून तिकडून उडय़ा मारून पक्षनिष्ठा खुंटीला टांगली. त्यांनी पक्षनिष्ठा काय असते ते आम्हाला शिकवू नये. आम्हाला लोकनेत्यांची शिकवण आहे अन्यथा आम्ही उठाव केल्यानंतर राहिलेल्या शिल्लक सेनेच्या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले असते, असा इशारा देऊन कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला, हे अवघ्या महाराष्ट्राला समजले आहे, असा जोरदार हल्ला राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर केला.
ते पाटण येथे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपा संदर्भात पत्रकारांशी बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई हे थोरच होते. त्याच लोकनेत्यांचा आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्यात काम करीत आहे. याबाबत वाचाळवीरांनी हे आपल्या नेत्यांना खासगीत विचारावे म्हणजे कळेल. तरीही जर कोणी आमच्यावर नाहक आरोप करून काहीही बरळून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल, असा इशारा देऊन मंत्री देसाई म्हणाले, राष्ट्रवादीची शिवसेना केलेले वाचाळवीर हे गेल्या 15 वर्षात इकडून तिकडे वेगवेगळ्या पक्षात उडय़ा मारून आम्हाला पक्षनिष्ठा शिकवत आहेत. ही हास्यास्पद बाब असून स्वतःला निष्ठावंत म्हणावणाऱया या वाचाळवीराने गेल्या 15 वर्षात किती पक्षाच्या पायऱया झिजविल्या याचे उत्तर द्यावे.
माझ्या मतदारसंघातील विकासकामांवर बोलण्याआधी स्वतःच्या गुहागर मतदारसंघातील जनतेला प्रथम हक्काचे पिण्याचे पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा देऊन तिथल्या अडचणी प्रथम सोडवा आणि मग दुसऱयाच्या मतदारसंघाची मापे काढा, असा जोरदार पलटवार करून मंत्री देसाई म्हणाले, हेच वाचाळवीर चिपळूणमधील पूरपरिस्थिती वेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमोर कोणत्या भाषेत काय बरळले होते, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. लोकप्रतिनिधी असतानाही या महाशयांचे अजूनही काही वादग्रस्त वाचाळ व्हिडीओ फिरताना दिसत आहेत. अशा प्रवृत्तींनी आम्हाला निष्ठेची भाषा कदापि शिकवू नये. हे वाचाळवीर आम्ही उठाव केल्यानंतर शिल्लक सेनेचे नेते झाले आहेत. त्यामुळे यांच्याच डोक्यात नेते पदाची हवा गेली आहे. परिणामी ते काहीही बरळत सुटले आहेत. आम्हाला लोकनेत्यांची शिकवण आहे अन्यथा त्यांच्याच भाषेत उत्तर आम्हीही दिली असती, असा गर्भित इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
भास्कर जाधव तुमचा नेमका हा कितवा पक्ष?
वाचाळवीर भास्कर जाधव ज्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे एजंट होते, त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्या आवाजाविषयी, त्यांच्या चालण्या बोलण्याविषयी अनेकवेळा मुक्ताफळे उधळून शिवसेनेवर विखारी टीका करून आपली वाचाळ आणि शिवराळ वाणी प्रकट केली आहे. नेहमी इकडून तिकडे उडय़ा मारणाऱया भास्कर जाधवांच्या हा नेमका कितवा पक्ष आहे? असा सवाल करून राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली शिवसेना हे जाहीरपणे माध्यमांसमोर मान्य करणाऱया राष्ट्रवादीच्या एजंटाने आम्हाला पक्षनिष्ठा म्हणजे काय हे शिकवू नये. त्यामुळे भास्कर जाधवांनी आम्हाला जास्त बोलायला भाग पाडू नये अन्यथा या आधीची आपली सर्व वाचाळ वक्तव्ये जनतेपुढे आणावी लागतील, असा इशाराही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.