अध्याय विसावा
भक्ताला भगवंताची भक्ती सर्वात प्रिय असते. त्यामुळे परिस्थिती कितीही बिकट आणि भक्ती करण्यासाठी विपरीत असली तरी भक्ती करण्याची तळमळ त्याला तीव्रतेने लागून राहिलेली असते म्हणून तो भगवंतांचा मनापासून धावा करतो. त्याची अत्यंतिक तळमळ पाहून भगवंत त्याच्या मदतीला धावून येतात. हे सर्व सांगून भगवंत पुढे म्हणाले, जेव्हा भक्ताला असा स्वाभाविक पूर्णपणे अनुताप होतो, तेव्हाच माझी कृपा होते. ज्या ठिकाणी खराखुरा अनुताप नाही, तेथे माझी कृपाही कधी होत नाही. देहात अनिवार अनुताप होणे, हेच माझ्या कृपेचे वर्म म्हणजे लक्षण आहे, असे तू समज. माझ्या कृपेशिवाय माझी भक्तीही उत्पन्न होत नाही. माझ्या कृपेची ज्याला प्राप्ती होते तोच माझी अनन्य भक्ति करतो. माझ्या कृपेचे लक्षण हेच की, प्राप्त झालेले विषय भोगत असताना माझ्या अनन्य भजनात तूट म्हणून पडत नाही. ह्याचच नाव माझी ‘पूर्ण कृपा’. असा माझा कृपांकित भक्त चढत्या वाढत्या प्रेमाने माझी नित्य नवी भक्ति करीत असतो. माझ्या प्रीतीखातर तो आपले घर, दार, स्त्री, पुत्र, संपत्ती व धनधान्य खर्ची घालतो. माझ्या भक्तीसाठी तो सर्वस्व खर्ची घालतो. कुणाला कदाचित याचं आश्चर्य वाटेल पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण माझ्या भक्तीसाठी स्वतःचा जीवप्राणही खर्ची घालण्यास तो मागे सरत नाही. असे सदासर्वदा तो माझे अनन्य भजन करत असतो. माझ्या भजनावर त्याचे अतिशय प्रेम असते. अहोरात्र माझे स्मरण म्हणून तो सोडत नाही. त्याच्या चित्ताला माझा विसर म्हणून पडत नाही. त्यापासून फल काय प्राप्त होते, ते आता ऐक. माझी निज भक्ति म्हणून जी मी तुला मागे सांगितली, त्याच पद्धतीने ते भक्त माझे अत्यंत प्रीतीने वारंवार यजन करतात. क्षणोक्षणी व पळोपळी न विसरता माझे स्मरण करत एकनि÷sने माझे भजन करून स्वतःलाच मदर्पण करून मीच होतात. दिवसेंदिवस चढाओढीने त्याचे प्रेम अनिवार वाढतच जाते. नित्य नवी गोडी लागत असल्यामुळे आवडीने पुनः पुन्हा भजनच करीत राहतात. केलेलीच भक्ति पुनः पुन्हा केली तरी त्याला कधी कंटाळा येत नाही, इतकेच नव्हे, तर अधिक हर्ष वाटत असल्याने माझ्या भजनाचा उल्हासच वाटतो. मला आपल्या हृदयात साठवून भजनावर मनापासून प्रेम असले म्हणजे सूर्यापुढे काजवा जसा निस्तेज होतो. त्याप्रमाणे साऱया इच्छा नाहीशा होऊन जातात. सिंहाला पाहिले म्हणजे माजलेल्या हत्तीला जशी पळता भुई थोडी होते, त्याप्रमाणे मी परमात्मा प्रगट झालो की, हृदयातून सगळय़ा विषयेच्छा दूर पळून जातात परंतु ‘मी प्रगट झालो’ असे म्हंटले असता त्या म्हणण्याला बट्टा लागेल कारण, माझ्याशिवाय जागाच जर रिकामी नाही, तर मी आता ‘प्रगट झालो’ असे कसे म्हणता येईल, कारण उद्धवा! मी खरोखर सदासर्वदा हृदयातच असतो. भक्तांची भ्रांती दूर झाली की, मी स्वभावतः प्रगटच आहे हे तू लक्षात ठेव.
भक्तांनी माझी भक्ति करून आपली भ्रांती नाहीशी केलेली असते. तेव्हा तेथे मी श्रीकृष्ण स्वयंभू सहज रीतीने प्रगटच आहे. मी हृदयात प्रगट होताक्षणी भक्तांना अलभ्य लाभ प्राप्त होतो आणि संसाररूप संकट दूर होते. तेच आता सविस्तर सांगतो ऐक. जेव्हा त्याला माझ्या सर्वात्म्याचा साक्षात्कार होतो, तेव्हा त्याच्या हृदयातील अज्ञान दूर होते त्याचे सर्व संशय छिन्नविच्छिन्न होतात आणि कर्मवासना सर्वथैव क्षीण होऊन जातात.
उद्धवा! मी ज्याला हृदयामध्ये भेटतो, तेव्हा मी केवळ त्याच्या हृदयात साठत नाही तर सर्वात्मा सर्वरूपानेच प्रगटतो. माझे स्वरूप काही लहानसहान नाही.अशा रीतीने मी प्रगट झालो म्हणजे मग संसार म्हणून डोळय़ांना दिसतच नाही. गुणांसहवर्तमान भेदाची त्रिपुटी मावळते, आणि भवभय तत्काळ पळून जाते सूर्याचे किरण लागले की, तुपाचा कठिणपणा नाहीसा होतो, त्याचप्रमाणे मी नारायण प्रगटल्याबरोबर न फोडताच लिंगदेह नाश पावतो हे तू लक्षात ठेव. चहूकडे धुके पसरले, तर ते जोराच्या वाऱयाने लागलेच उडून जाते, त्याप्रमाणे माझ्या स्वप्रकाशापुढे वासनेचे जाळे समूळ नाहीसे होते.
क्रमशः