शिवसेना ( ठाकरे गटाचे ) खासदार संजय राउत यांनी आपल्या कोल्हापूर दौऱ्यावर असताना हे विधीमंडळ नाही तर चोरमंडळ असल्याचे विधान केल्याने विधानसभेत सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले असून संजय राउत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी हि मागणी उचलून धरली आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या या हक्कभंगाची कारवाईवर संजय राउत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपले विधान हे विधी मंडळाबद्दल नसून शिवसेना पक्ष आणि त्याचे चिन्ह चोरणाऱ्या शिंदे गटाच्या सदस्यांसाठी होते असं त्यांनी सांगितलं.व यावेळी बोलताना ते म्हणाले, ” मी स्वतः देशातील सर्वोत्तम उच्च सभागृहाचा सदस्य आहे. संसद आणि विधिमंडळाचा मी नेहमीच आदर केलेला आहे. शिवसेनेने संसदीय लोकशाहीवर नेहमी विश्वास ठेवला आहे. आज माझ्याबद्दल सभागृहात गदारोळ घालण्यात आला. माझ्या भावना समजून न घेता एकाकी पद्धतीने कारवाई होत असेल ते लोकशाहीला आणि लोकशाही परंपरेला धरून नाही.” अशी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा >>>> डुप्लिकेट शिवसेनेचे हे विधिमंडळ नव्हे चोरमंडळ
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी काय म्हणालो हे समजून घेतले पाहिजे. या महाराष्ट्रात विरोधी पक्षांना व नेत्यांना देशद्रोही म्हटलं जातं. शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव चोरून विधिमंडळात गेले तो पक्ष नव्हे. त्यांचा उल्लेख चोर असा केला जातो. ज्यांनी बेईमानी आणि गद्दारी केली त्यांना मी चोर म्हणालो. ते स्वतः चोर आहेत त्यांच्यामुळे विधिमंडळाची बदनामी होते.” असे ते म्हणाले
शेवटी बोलताना त्यांनी “ज्यांनी बाळासाहेबांचे विचार चोरले, त्यांच्या पुरती ही गोष्ट मर्यादित आहे. त्यांच्यावरच अपात्रतेची टांगती तलवार आहे. मी विधिमंडळाचा कधीच अपमान करणार नाही. ज्यांनी बेईमानी, गद्दारी केली त्यांनाच मी चोर म्हणालो” अशी प्रतिक्रिया दिली.