प्रतिनिधी/ सातारा
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. जिह्याच्या पश्चिम भागात पावसाने चांगलीच दिवसभर रिपरिप सुरू ठेवली होती. महाबळेश्वर येथे सायंकाळी 5 वाजता 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सातारा शहराला चांगलेच पावसाने झोडपून काढले. नीरा, वीर, उरमोडी, कण्हेर, मोरणा आदी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिह्यात मंगळवारी पावसाचा जोर वाढला होता. सातारा, जावली, महाबळेश्वर, वाई, कराड, पाटण या तालुक्यात पावसाची सततधार सुरू होती. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने घराबाहेर पडणे अनेकांनी टाळले. सातारा शहराला सकाळपासून चांगलेच झोडपून काढले. सखल भागात पाणी साठले होते. जिह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असल्याने काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यात कण्हेरमध्ये 500 क्यूसेक्स, उरमोडीमधून 500 क्यूसेक्स, धोम बलकवडीमधून 300 क्यूसेक्स, वीरमधून 1200 क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरण क्षेत्रात सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना 92 मि.मी., नवजा 64 मि.मी., महाबळेश्वर 102 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच तालुका निहाय झालेला सकाळी 8 वाजेपर्यंतचा पाऊस पुढीलप्रमाणे 69.3 मि.मी., जावली 79.6 मि. मी., पाटण 72.6मि. मी., कराड 62.4 मि.मी., कोरेगाव 47.4 मि. मी., खटाव 38.8 मि. मी., माण 26.8 मि. मी., फलटण 88.3 मि. मी., खंडाळा 58.7 मि. मी., वाई 53.0 मि.मी., महाबळेश्वर 192.0 मि. मी., जिह्यात 66.5 मि. मी. पाऊस झाला आहे.
यवतेश्वर घाटात कोसळली दरड
पंधरा दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा एकदा कास, बामणोली, परळी भागासह जिह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोर धरला आहे. मुसळधार पडणाऱया पावसामुळे कास धरणा लगतचा वाहतुकीचा पूल सकाळपासुनच पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून व यवतेश्वर घाटातही दोन ठिकाणी दरड कोसळून दगड मातीचा भराव रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. दुपारी संबंधीत विभाग व ठेकेदार यांनी रोडवर आलेला मातीचा भराव दगड जेसीबी डंपरच्या सहाय्याने हटविण्याचे काम हाती घेऊन ती पूर्णपणे हटविल्याने वाहतूक पुन्हा सुरुळीत करण्यात आली.