शिंदे-फडणवीस’ जोडीची ग्वाही ः दिल्लीत दोन दिवस गाठी-भेटी, चर्चांचे सत्र
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱयात भाजपमधील अनेक दिग्गजांच्या भेटी-गाठी घेतल्या. दोघांनीही राष्ट्रपती, पंतप्रधानांसह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधत विविध पातळीवर चर्चा केली. या बैठकांमधील चर्चेसंबंधी दोघांनीही चुप्पी पाळली असली तरी राज्याचा विकास साधत पुढील कार्यकाळ पूर्ण करणार असल्याची ग्वाही संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या नियोजित भेटीआधी महाराष्ट्र सदन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत काही फोटोही पोस्ट केले आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शुक्रवारपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱयावर होते. यादरम्यान शनिवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या प्रगतीत केंद्र सरकारच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालथ आणि शिवसेनेतील बंडानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी 30 जून रोजी राज्यातील सत्तेची सूत्रे हाती घेतली. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
शहा, नड्डा, राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा
शिंदे-फडणवीस यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून सुरू केलेला भेटींचा सपाटा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचला. शुक्रवारी रात्रीच दोघांनीही अमित शहांची चार तासांहून अधिक वेळ चर्चा करत महाराष्ट्रातील बदललेली राजकीय स्थिती, न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे समजते. त्यानंतर शनिवारी सकाळच्या सत्रात भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अन्य काही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. तर, सायंकाळी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी दोघांनीही नरेंद्र मोदी यांची भेट घेत काहीवेळ चर्चाही केली.
नैसर्गिक युतीच महाराष्ट्राला तारणार ः मुख्यमंत्री
भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युतीच महाराष्ट्राला पुढे नेऊ शकते, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही राज्याच्या विकासासाठीच एकत्र आल्याचे स्पष्टीकरण पुन्हा एकदा दिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्या आमदारांचे अस्तित्व धोक्मयात आले होते, मग आम्हाला बोलता येत नव्हते, म्हणून आम्ही हे पाऊल उचलल्याचे त्यांनी नमूद केले. विकासाची भूमिका घेऊन आम्ही हे सरकार स्थापन केले आहे. जे काम अडीच वर्षांपूर्वी करायचे होते ते आता झाले आहे, असेही ते पुढे म्हणाले. विविध नेत्यांच्या भेटीनंतर आम्ही पंतप्रधानांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांची दृष्टी जाणून घेणार असल्याचेही स्पष्ट केले.
कार्यकाळ पूर्ण करण्याला प्राधान्य ः उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या पक्षाने यापूर्वीच्या सत्ताकाळात मला मुख्यमंत्री बनवले होते. आता पक्षाच्या गरजेनुसार पक्षाच्या निर्णयाचे पालन करत उपमुख्यमंत्रिपद भूषवणार आहे. एकनाथ शिंदे आमचे नेते आणि मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या हाताखाली काम करू. आता आमची नैसर्गिक युती पुन्हा जिवंत झाली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत काम करणार असून हे सरकार यशस्वी करणे हे आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित शहांचे प्रोत्साहनात्मक ट्विट
महाराष्ट्रातील दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. याप्रसंगी भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटातील सत्तावाटपाच्या सूत्रावर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर ‘मला खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही दोघेही प्रामाणिकपणे जनतेची सेवा कराल आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाल.’ असे ट्विट शहा यांनी शुक्रवारी रात्री केले होते.