मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; प्रशासनाकडून जय्यत तयारी
प्रतिनिधी/ कराड
देशाचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समिती कराड, कृषी विभाग, सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सतराव्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशु पक्षी प्रदर्शनाचे 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान. आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेली 2 वर्षे कोरोनामुळे सदर प्रदर्शन आयोजित करता आले नाही. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध हटल्यामुळे प्रदर्शन पुनश्च एकदा आयोजित केले जात आहे.
गेल्या अनेक दिवसात शेतकऱयांना लहरी हवामानाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे हातामध्ये आलेले वाचवताना शेतकऱयांची दमछाक होते. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱयांनी आच्छादित शेतीकडे वळावे, यासाठी यावर्षी संरक्षित शेतीही संकल्पना ठेवण्यात आली आहे. त्यानुसार प्रदर्शनामध्ये विविध प्रात्याक्षिके, मॉडेल्स व शासकीय योजनांची माहिती सादर केली जाणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली 25 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती असून जिल्हय़ातील सर्व राज्यसभा, लोकसभा, विधानपरिषद व विधानसभा सदस्य यांना देखील विशेष निमंत्रित केले जाणार आहे.
प्रदर्शनामध्ये 100 विविध शासकीय उपक्रम व शेतकरी यांच्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यामध्ये सीताफळ प्रक्रिया, नाचणी, खपली गहू, शेवया, आवळा, सेंद्रिय गूळ, सेंद्रिय शेती, जवस, बेदाणा, हळद, प्रक्रिया केलेले आले, ज्वारी, तांदूळ, परदेशी भाजीपाला, दुग्धप्रक्रिया, राजगिरा, कडधान्ये, संत्रा यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विकास विभागामार्फत विविध पिकांच्या स्पर्धा आयोजित केल्या असून 24 रोजी ऊस पीक स्पर्धा, 25 रोजी केळी घड स्पर्धा, 26 रोजी विविध फुले स्पर्धा, 27 रोजी विविध फळे स्पर्धा व 28 रोजी भाजीपाला स्पर्धा होणार आहे. प्रदर्शनामध्ये ड्रोन फवारणी, सोलर पंप, आच्छादित शेती, स्वयंचलित सूक्ष्म सिंचन, व्हर्टिकल फार्मिंग, बिन मातीची शेती (हायड्रोफोनिक्स), जैवइंधन आदींची प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने होणाऱया जिल्हा कृषी महोत्सव योजनेतील राज्यातील पहिला जिल्हा कृषी महोत्सव देखील या कृषी प्रदर्शनादरम्यान आयोजित होत आहे.
कोरोना कालावधीत यात्रा / उत्सव बंद असल्यामुळे विरंगुळा म्हणून विविध मनोरंजन साधने व आकाश पाळणे लावण्याबाबत शेतकरी संघटनांकडून मागणी झाली होती, त्या अनुषंगाने संरक्षित आकाशपाळणे लावले जाणार आहेत.
लम्पीच्या पार्श्वभूमीवर गाय, म्हैस स्पर्धा नाही
या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकऱयांनी लाभ घ्यावा यासाठी प्रत्येक गावातून शेतकरी सहलीचे आयोजन करण्याबाबत जिल्हा परिषद स्तरावरून कार्यवाही केली जाणार आहे. यावर्षी लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुपक्षी प्रदर्शनामधून गाय, म्हैस स्पर्धा वगळण्यात आली आहे. मात्र शेळी मेंढी प्रदर्शन व श्वान प्रदर्शन नेहमीप्रमाणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचेमार्फत आयोजित केले जाणार आहे.