जागृती महिला मंचतर्फे शहरात निदर्शने : अप्परजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन
बेळगाव : हुबळी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या निर्घृणपणे केलेल्या हत्येच्या निंद्य कृत्यामुळे मानवजातीला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. या कृत्याचा जाहीर निषेध करत जागृती महिला मंचतर्फे शहरामध्ये मोर्चा काढून चन्नम्मा चौकात आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन अप्परजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना देण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी अत्यंत बेजबाबदार प्रतिक्रिया देऊन आरोपीला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. या प्रकरणामध्ये राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप केला. अपराध्याला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हत्या झालेल्या निष्पाप विद्यार्थिनीच्या पालकांबाबत खालच्या पातळीवर जावून प्रतिक्रीया दिली आहे. अशा माध्यमातून या निंद्य कृत्याला प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात आले आहे. सत्तेसाठी काँग्रेस पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण आहे, असा आरोपही करण्यात आला.
आरोपीला शिक्षा मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा
राज्यभरात या घटनेवरुन आंदोलने केली जात आहेत. जनतेतून सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारे अपराध्यांना रक्षण देण्याचे काम सुरू राहिल्यास समाजाचे स्वास्थ्य बिघडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे याचा जाहीर निषेध करून आरोपीला शिक्षा मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला. हत्या झालेल्या विद्यार्थिनींच्या पालकांकडून 7 ते 8 संशयितांची नावे दिली आहेत. मात्र आतापर्यंत या कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. तत्पूर्वी मारुती गल्ली येथील मारुती मंदिरामध्ये बैठक घेण्यात आली. यानंतर शहरातील महत्त्वाच्या गल्ल्यांमधून मोर्चा काढण्यात आला. शनिवार खुट, काकतीवेस मार्गे चन्नम्मा चौकात मोर्चा नेवून आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार मंगला अंगडी, माजी आमदार संजय पाटील, अनिल बेनके, किरण जाधव यांच्यासह महिला संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. विविध मठांचे मठाधीश उपस्थित होते.