ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अडीच वर्षांच्या सत्ताकाळात राज्याला अधोगतीकडे नेणाऱ्या, कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणाऱ्या तसेच गुन्हेगारांना मदत करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अनुचित उद्गार काढू नये. त्यांनी तोंडाला आवर घालावा, अन्यथा परिणामांना तयार राहा, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
राणे म्हणाले, नेमके फडतूस कोण हे राज्यातील जनतेने उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात पाहिले आहे. कार्यतत्पर, धडाडीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र याखेरीज दुसरी ओळखच नसलेल्या कर्तृत्वशून्य उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशोभनीय भाषेत टीका करू नये. अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.
सत्ता गेल्याच्या नैराश्यातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाबद्दल असूया असल्यानेच उद्धव ठाकरे खालच्या पातळीवर जाऊन असभ्य शब्दांत टीका करत आहेत. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. 2019 मध्ये भाजपाच्या आधारावर ज्यांचे आमदार निवडून आले. त्याच भाजपाला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्ववादाला सोडचिट्ठी दिली. मुख्यमंत्री असताना राज्याला अधोगतीकडे नेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यासारख्या पोलीस अधिकाऱ्याला संरक्षण दिले, देशद्रोही शक्तींशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांना पाठीशी घातले, असेही राणे म्हणाले.