वृत्तसंस्था/ मँचेस्टर
यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटची कसोटी 10 सप्टेंबर शुक्रवारपासून येथे खेळविली जाणार आहे. या शेवटच्या कसोटीसाठी यष्टीरक्षक आणि फलंदाज बटलर तसेच डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच यांचे पुनरागमन झाले आहे.
या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडवर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. सोमवारी भारताने ओव्हल मैदानावरील चौथ्या कसोटीत इंग्लंडचा दणदणीत पराभव केल्याने आता इंग्लंडला या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी शेवटची कसोटी जिंकावी लागेल. भारतीय संघाला बऱयाच वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीत कसोटी मालिका जिंकण्याची संधी मिळाली आहे.
या शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंडच्या निवड समितीने मंगळवारी संघाची घोषणा केली. चौथ्या कसोटीसाठी उपलब्ध न झालेला यष्टीरक्षक-फलंदाज बटलरचे तसेच फिरकी गोलंदाज लीचचे इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे. 2007 नंतर इंग्लंडने मायभूमीत भारताविरुद्ध कसोटी मालिका गमावलेली नसल्याने त्यांच्यावर शेवटच्या सामन्यात अधिक दडपण राहील. शेवटच्या कसोटीसाठी अँडरसनला कदाचित विश्रांती देवून मार्क वूडला अंतिम अकरा खेळाडूंत संधी देण्याची शक्यता आहे.
इंग्लंड संघ- रूट (कर्णधार), मोईन अली, अँडरसन, बेअरस्टो, बर्न्स, बटलर, सॅम करन, हसिब हमीद, लॉरेन्स, लीच, मलान, ओव्हर्टन, पॉप, रॉबिन्सन, वोक्स आणि मार्क वूड.