प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर शहर परिसरात दोन ठिकाणी बंद असलेली घरे फोडून चोरटय़ांनी तीन तोळय़ाचे गंठण व रोख रक्कम लंपास केली.
मयेकरनगरात भाडोत्री राहणारे बाळू सातेरी पाटील हे आपल्या घराला कुलूप लावून आपल्या सासरवाडीला गेले होते. ते मंगळवारी सकाळी घराकडे आले असता घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कपाटातील वस्तू इतरत्र पडलेल्या होत्या. त्यांनी कपाटात पाहिले असता तीन तोळय़ाचे गंठण चोरीला गेले असल्याचे निदर्शनास आले.
दुसरी घरफोडीची घटना विद्यानगर वसाहतीत घडली. या वसाहतीमध्ये सलीम यांच्या चाळीत राहणाऱया मेरी मस्करेन यांच्याही घराचे कुलूप तोडून चोरांनी आत प्रवेश केला व ऐवज लंपास केला. मेरी या आपल्या मुलाकडे पुण्याला राहायला गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातील कोण-कोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत हे समजू शकले नाही. त्यांच्या घरमालकाने त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून चोरीची माहिती दिली. त्यावेळी मस्करेन यांनी ट्रंकमध्ये काही रक्कम ठेवली असल्याचे त्यांना सांगितले. मात्र त्यात रक्कम नसल्याने चोरांनी ती पळवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अधिक तपासासाठी बेळगावहून श्वानपथक मागवण्यात आले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
यापूर्वी रविवारी मध्यरात्री महामार्गावरच 5 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. आता पुन्हा दोन घटना घडल्याने पोलीस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. दीड वर्षापूर्वी खानापूर परिसरात बंद असलेली घरे फोडून चोरी करण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढले होते. पण त्यापैकी बहुतांश चोऱयांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले होते. यामुळे दीड वर्षापासून चोरीच्या घटना घडल्या नव्हत्या. पण आता पुन्हा चोरीच्या घटना घडण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.