मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे आश्वासन
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री येडियुराप्पा दावोस येथील जागतिक शिखर परिषद आटोपून बेंगळूरला परतताच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पुन्हा चर्चेचे गुऱहाळ सुरू झाले आहे. येडियुराप्पा यांनी तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, असे सांगितले असून पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्यांपैकी किती जणांना मंत्रिपदे मिळतील?, याविषयी कुतुहल निर्माण झाले आहे.
बेंगळूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी दुपारी येडियुराप्पांचे आगमन होताच पत्रकारांनी त्यांना गराडा घालून मंत्रिमंडळ विस्ताराविषयी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर नूतन मंत्र्यांची यादी तयार करण्यात येईल. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेल्यांनाच मंत्रिपदे दिली जातील, असे त्यांनी सांगितले.
शनिवारी अमित शहा बेंगळुरात येत आहेत. यावेळी मागील महिनाभरापासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पुन्हा एकदा चर्चा होईल. भाजपाध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची निवड झाल्यामुळे येडियुराप्पा त्यांच्याशीही चर्चा करण्याची शक्यता आहे. नूतन मंत्र्यांकडून दबाव आल्यामुळे येडियुराप्पा यांनी तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे आश्वासन दिले आहे.
16 जागा रिक्त
येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळात एकूण 16 जागा रिक्त आहेत. डिसेंबरमध्ये 15 निजद-काँग्रेसमधून पक्षांतर केलेल्या नेत्यांमुळे रिक्त झालेल्या 17 पैकी 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यापैकी 12 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. निवडून आलेल्यापैकी एक जण मूळ भाजपचा उमेदवार होता. भाजपश्रेष्ठींनी निवडून आलेल्यांपैकी 7 ते 8 जणांना मंत्रिपदे आणि पक्षातील मूळ 6 आमदारांना मंत्रिपदे देण्यात यावीत, असा सल्ला दिला आहे. पण येडियुराप्पांचा या सुत्राला विरोध आहे. 11 नूतन आमदारांना मंत्रिपदे द्यावीत अशी मागणी केली आहे.
‘त्या’ नेत्यांच्या गटात नाराजी
मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याने पक्षांतर करून आलेल्या 17 जणांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला आणखी विलंब झाल्यास पुढील आठवडय़ात आपल्या गटाची बैठक बोलावण्याची तयारी त्यांनी केली आहे. सर्वांनाच मंत्रिपदे द्यावीत, अशी मागणी नूतन आमदार बी. सी. पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांनी लक्ष्मण सवदींचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.