प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिका प्रशासनाचा कारभार किती चांगला आहे याबाबत भविष्यातील निवडणुकीत सातारकरांचा कौल मिळेलच. सध्या मात्र विविध समस्यांना सामोरे जात जगणे सुसहय़ करुन घेत आहेत. शहरात पार्किंगचा प्रश्न प्रचंड तीव्र असताना दुसरीकडे राजवाडय़ानजिक मंगळवार पेठेकडे जाणाऱया प्रतापसिंह भाजी मंडईचे प्रशस्त पार्किंग मद्यपींचा अड्डा बनला असल्याने वापरता येत नाही. तर त्याच पार्किंग परिसरात भाजी विक्रेत्यांकडून टाकण्यात येणारा कचरा खाण्यासाठी वाढलेला मोकाट जनावरांचा वावर पाहता पालिका प्रशासनाकडे या अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सातारा शहरातील रस्त्यांवर सध्या एकेरी वाहतूक सुरु आहे. पार्किंगचा प्रश्न निर्माण होत असल्याने सम-विषम पार्किंग सुरु असते. तर राजवाडा परिसरात पार्किंगचा प्रचंड बोजवारा उडाल्याचे दिसून येते. राजवाडय़ासमोर असलेल्या अभयसिंहराजे भोसले संकुलातील पार्किंग हे देखील मद्यपींचा अड्डा बनलेले असते. त्यामुळे तिथे सामान्य माणूस गाडी पार्किंग करण्यास धजावत नाही. तिथेच मटक्याच्या चिठ्ठय़ा फाडणारेही बसलेले असतात. ही परिस्थिती या पार्किंगची असताना श्री. छ. प्रतापसिंह भाजी मंडईत असलेले प्रशस्त पार्किंग देखील समस्यांच्या भोवऱयात सापडलेले आहे.
मंगळवार पेठेकडे जाताना असलेली ही भाजी मंडई प्रशस्त बांधून तिथे सातारकरांची भाजीपाला खरेदी करण्याची सोय करण्यात आली. त्यासाठी तळमजला हा पार्किंगसाठी देण्यात आला. त्याच्यावर असलेल्या मजल्यावर मंडई भरते. हजारो सातारकर तिथे भाजी खरेदीसाठी येतात मात्र त्यांना वाहन पार्क करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पालिकेने पार्किंग दिलेले असले तरी त्यात असलेला मद्यपींचा वावर, दारुच्या बाटल्या, फेकलेले प्लास्टिक ग्लास, काहींनी पिल्यानंतर उगीचच राष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी फोडलेल्या बाटल्यांमुळे पसरलेल्या काच यात आता पार्किंग कसे करायचे हा प्रश्न पालिका प्रशासनाने कधीतरी सोडवण्याची गरज आहे.
एकतर पार्किंग तळात असल्याने तिथे वीजेची सोय करण्याची गरज आहे मात्र पालिकेने पार्किंग परिसरात अशा प्रकारे कोणतीही सुविधा दिलेली नाही. तर तेथीलच काही भाजी विक्रेते विक्री करुन राहिलेल्या भाजीपाल्याचा कचरा अगदी न लाजता पार्किंग परिसरात आणून टाकत असल्याने साताऱयातील मोकाट जनावरे पार्किंगमध्ये हक्काने बसलेली आढळून येतात. त्यावर कोणाचे नियंत्रण नाही कारण जनावरे मोकाटच आहेत. दारुच्या बाटल्या, कचरा यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधी मध्येच मोकाट मद्यपी आणि मोकाट जनावरांचा वावर असल्याने सातारकर गृहिणी जेव्हा भाजी खरेदीसाठी जातात तेव्हा मग पार्किंग रस्त्यावरच केले जाते मग वाहतूक कोंडीची समस्या अटळच असते.
मद्यपींना पोलिसी खाक्याची गरज
भाजी मंडईत येणाऱया सातारकरांना खरेदीसाठी आल्यानंतर त्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी या भाजी मंईत प्रशस्त पार्किंग परिसर देण्यात आला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तो राष्ट्रीय प्रश्नावर चर्चा करणाऱया मद्यपींचा अड्डा बनलाय. हा अड्डा दिवसाही असतो व रात्रीतर त्याला भांडणे, शिवीगाळ, मारामारीमुळे चांगलाच बहर येतो. मग नागरिकांनी पार्किंगचा वापर कसा करायचा. त्याच मंडई म्हटले की महिलांची गर्दी असते. त्या दुचाकी रस्त्यावर पार्क करतात त्यामुळे अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत असतो. तिथे पोलिसी खाक्या वापरण्याची गरज नागरिकांनी तसेच भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
पार्किंग परिसरात सुरक्षा रक्षक नेमा
पार्किंग आहे. मात्र असूनही तिथे अवैध प्रकार सुरु असल्याने त्याचा वापर करताना नागरिकांना अडचणी येतात. त्यासाठी हे पार्किंग स्वच्छ करुन तसेच तिथे लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे या सुविधा देवून पालिकेने तिथे सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची गरज आहे. आवश्यक वाटल्यास तिथे कमी पार्किंगसाठी 5 रुपये शुल्क घेतल्यास नागरिकांची काही तक्रार असणार नाही. मात्र ते पार्किंग स्वच्छ व सुविधांसह असले पाहिजे, ही नागरिकांची अपेक्षा आहे.