पत्रकारांसमोर जोडले हात, मुख्यमंत्रीच उत्तर देणार असल्याचे केले स्पष्ट
प्रतिनिधी/ पणजी
म्हादईसंदर्भात आपण काहीच बोलू शकत नाही. कृपया त्या विषयावर कोणताही प्रश्न विचारू नका, त्यासंबंधी तुमचे मुख्यमंत्रीच काय ते तुम्हाला सांगतील, असे स्पष्ट करत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांसमोर चक्क हात जोडून माफी मागितली.
पर्वरी येथे सचिवालयात काल रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेच्या प्रारंभीच त्यांनी आपण केवळ कृषी विधेयक विषयावर बोलणार असल्याचे सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता. तरीही पत्रकारांनी त्यासंदर्भात प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, प्रत्येक वेळी, ‘म्हादईचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यासंदर्भात आपण काहीच बोलू शकत नाही, तुमचा मुख्यमंत्रीच माहिती देऊ शकेल’, या एकाच वाक्याचा त्यांनी दोन तिनदा उच्चार केला. शेवटी पत्रकारांसमोर हात जोडून माफी मागितली व पत्रकार परिषद संपल्याचे जाहीर केले. एखाद्या न्यायप्रविष्ठ विषयावर केंद्रीय मंत्री बोलू शकत नसेल तर एक मुख्यमंत्री कसा बोलू शकेल? या गोष्टीचा जावडेकर यांना विसर पडल्याचे दिसून आले.
दरम्यान, केवळ कृषी विधेयक विषयावर बोलणार असल्याचे सांगणाऱया मंत्र्यांनी नंतर मोले येथील झाडांची कत्तल, कोळसा वाहतूक, आदी विषयांवर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले असता, त्यासंदर्भात निवेदन दिल्यास आपण जरूर विचार करू, असे आश्वासन दिले. काँग्रेसकडून सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात विचारले असता, काँग्रेसच्या 2014च्या जाहीरनाम्यातच कृषी विधेयकातील गोष्टी होत्या. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अनेक भाषणातही त्यासंबंधी उल्लेख आहेत. परंतु आता त्यांना त्याचा विसर पडलेला असून केवळ त्यांचा विरोध हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे जावडेकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱयांच्या हितासाठीच कार्यरत असून काँग्रेसने लोकांची चालविलेली दिशाभूल थांबवून विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.