रेल्वे रुळांवरील अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गडद पिवळ्या रंगाचा वापर; 2018-19 हे सरते वर्ष रेल्वेसाठी काहिसे सुरक्षित
मुंबई / प्रतिनिधी
मुंबई लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. या लोकलवर होणारा कोणताही परिणाम सरळ सरळ मुंबईच्या जीवनावर परिणाम करतो. पावसाळ्यात लोकल ठप्प झाल्यास किंवा इतर वेळी एखादा अपघात झाल्यास मुंबईची लाईफलाईन थांबते आणि मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. त्यामुळे नेहमी रेल्वे प्रशासन या लोकलला सुरळीत चालू ठेवण्याच्या मागे असते. त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यामागे त्यांचा कल असतो. यादृष्टीने विविध उपाययोजना मध्य रेल्वे प्रशासनाकडून राबवल्या गेल्या. यामुळे सरत्या वर्षात मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे अपघातांमध्ये 10 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांनी दिली.
लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. अशातच व्यापक असलेल्या रेल्वे वाहतुकीत सोईसुविधांसोबत बिघाडतंत्रही गाठीशी असतात. मात्र, 2018-19 हे सरते वर्ष रेल्वेसाठी काहिसे सुरक्षित ठरले आहे. रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात, रेल्वेचा टपावर चढत विजेचा धक्का लागून झालेला अपघात, फलाट आणि रेल्वेमधील जास्तीच्या अंतरात पडून झालेला अपघात अशा अपघातांमुळे प्रवाशांना जीव गमवावा लागत असे. मात्र, रेल्वे मार्गावर होणाऱया अपघातांच्या घटनांमध्ये 10 टक्क्यांनी घट झाली आहे.
वडाळा रेल्वेस्थानकातील मनोवैज्ञानिक प्रयोगाची सर्व स्थानकांवर आवश्यकता
वडाळा रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना मोठय़ा प्रमाणात अपघात होत होते. मात्र, या स्थानकात रेल्वे प्रशासनातर्फे काही महिन्यांपूर्वी मनोवैज्ञानिक प्रयोग करत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. ज्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱया अपघातांच्या संख्येमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली आहे. मुंबईच्या फायनल माईल नावाच्या कंपनीने रेल्वेसोबत मिळून केलेल्या या प्रयोगाला चांगले यश मिळाले. रेल्वे रूळ पार करण्याच्या घाईमध्ये अचानक रेल्वे समोर येते आणि त्यामुळे अपघात घडून येतो. पण असा निर्णय लोक का घेतात? याच कारणावर रेल्वे प्रशासनाने क्रिएटीव्हपणे तोडगा काढत उपाय म्हणून काही पोस्टर्स लावले, ज्यामध्ये एक मनुष्य ट्रेनच्या खाली येत आहे. हे पोस्टर अशा जागांवर लावण्यात आले जिथे सर्वात जास्त अपघात होतात. हे पोस्टर लावण्याचा परिणाम असा झाला की, तिथून जाताना लोकांची नजर त्या पोस्टरवर पडत असे आणि संभाव्य अपघाताची कल्पना करत ते अलर्ट होत असत.
रेल्वे रुळांवरील अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गडद पिवळ्या रंगाचा वापर नवीन वर्षात रेल्वे रुळांवरील अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गडद पिवळ्या रंगाचा वापर करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यासोबतच धोकादायक ठिकाणी अपघातामुळे होणाऱया परिणामांचे पोस्टरदेखील आरपीएफ जवानांकडून लावण्याचे नियोजन आहे. ही अभिनव कल्पकता मध्य रेल्वेतर्पे मुंबई विभागात करण्यात येत असून कळवा-ठाणे स्थानकादरम्यान हा प्रयोग करण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यांत मुंबई विभागातील 50 अतिधोकादायक ठिकाणी हे रंगाचे प्रयोग राबवले जाणार आहेत.
घटना 2018 2019
रेल्वे रूळ ओलांडणे 944 859
रेल्वेमधून पडणे 441 379
खांबाला धडक 09 03
विजेचा धक्का 17 08
आत्महत्या 17 12