घरफाळ्याला भ्रष्टाचाराची कीड
विनोद सावंत / कोल्हापूर
गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेचा घरफाळा विभाग चर्चेत आहे. आतापर्यंत नियुक्त केले दोन कर निर्धारक व संग्रहकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी धोका नको म्हणून या विभागाची जबाबदारी थेट सहाय्यक आयुक्तांवरच सोपवली. त्यांच्यावर सुद्धा घरफाळा लावण्यासाठी पैसे घेतल्याच्या तक्रारी येत आहेत. आता मात्र, संपूर्ण विभागाचीच सफाई करण्याची वेळ आली असून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
शासनाला प्रत्येक नागरिकांना सेवा सुविधा देणे शक्य नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची उभारणी केली. स्वतः उत्पन्नाचे स्त्रोत तयार करून त्यातून मिळणार्या उत्पन्नातून नागरिकांना रस्ते, गटारी, पाणी, आरोग्य अशा सुविधा उपलब्ध करणे हा यामागील उद्देश आहे. स्थानिक स्वराज संस्था स्वबळावर चालण्यासाठी त्यांना कायद्यानेच काही उत्पन्नाचे स्त्रोतही निर्माण करून दिले. घरफाळा त्यापैकी एक आहे. जोपर्यंत जकात नाका, नगररचना, इस्टेटमधून अपेक्षित उत्पन्न मिळत होते. तोपर्यंत घरफाळा विभागाकडे दुर्लक्ष झाले. मात्र, जकात बंद झाले, कोरोनामुळे टीपी, इस्टेटचे उत्पन्न घटले. यानंतर मात्र, घरफाळा हे महापालिकेचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत बनले. किंबहुना घरफाळा 100 टक्के वसुल झाला तर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्या, अशी अटही राज्य शासनाने घातली.
सहाय्यक आयुक्तांही आरोपाच्या पिजर्यात
घरफाळा विभागालाच भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे एकामागून एक घोटाळे समोर येत आहेत. आतापर्यंत नियुक्त केलेल्या तीनही कर निर्धारकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहे. यामध्ये एकावर फौजदारी आणि निलंबनाची तर एकाला पदावरून हटविण्याची कारवाई झाली. यानंतर थेट सहाय्यक आयुक्तांकडेच या विभागाचा पदभार दिला. मात्र, तेही आता आरोपाच्या पिंजर्यात आहेत. त्यामुळे घरफाळा प्रामाणिक अधिकारी केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्वतःचे घर भरले विषय संपला
कोल्हापूर महापालिकेमध्ये पारदर्शक कारभार चालणार विभाग आणि प्रामाणिक काम करणारे अधिकारी दुर्मिळ झाले आहेत. किंबहुना ते शोधण्याची वेळ आली आहे. काहींनी तर स्वतःचे घर भरले विषय संपला, अशी भूमिका घेतली असून तिच महापालिकेसाठी घातक ठरत आहे.
स्वतःच्या वरकमाईसाठी महापालिकेचे नुकसान
राज्यशासनाकडून जीएसटीचे अनुदान मिळाले तर महापालिकेचा खर्च निघत आहे. अनुदानाला विलंब झाला तर कर्मचार्यांचे पगार, पेन्शन थांबते. अशी स्थिती असताना संबंधितांकडून घरफाळ्यातून उत्पन्न वाढवणे सोडाच काहींकडून वरकमाई कशी होईल, यातच धन्यात मानली जात आहे.
भ्रष्टाचाराला नागरिकांकडूनच खतपाणी
घरफाळ्यामध्ये भ्रष्टाचार आणि मनपाचे नुकसानीला केवळ अधिकारी, कर्मचारी जबाबदार नसून मिळकतधारकही तितकेच जबाबदार आहेत. त्यांच्याकडून घरफाळा कमी लागण्यासाठी अधिकारी, कर्मचार्यांना आर्थिक अमिष दाखवली जाते. स्वतःहून चालून आलेली `लक्ष्मी’ कशाला नकारायचे असे म्हणून अधिकारीही हात धुवून घेत आहेत. (उदा. : दर वर्षी पाच हजार घरफाळा जमा करावा लागू नये म्हणून अधिकार्याला एकदाच 40 ते 50 हजार देऊन तो दोन हजार करून घेणे)
पाणी कुठे मुरते…
- जुनी मिळकत असताना नवीन बांधकाम केल्याचे दाखवून त्यावर्षाचाच घरफाळा लावणे.
- क्षेत्र कमी दाखवून घरफाळा कमी लावण्यासाठी सेटलमेंट करणे.
- व्यावसायिक मिळकत असताना मालक वापर दाखवणे.
- घरफाळा बिलांवर नाव कमी करणे, नवीन चढवणे