प्रतिनिधी/ सातारा
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. फार पूर्वीपासूनच संत महात्म्यांनी झाडांचे रोपण करा, पर्यावरण वाचवा असे सांगून ठेवले आहे. सध्या मात्र शासनाकडून झाडांच्या रोपणाकरता कोटय़ावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. साताऱयातील चार भिंती परिसरात यावर्षी पावसाळय़ात झाडे लावण्यात आली. ती झाडे अक्षरश खड्डे न खोदताच माती नुसती बाजूला सारुन त्यात उभे केली होती. त्यामुळेच आज त्याचे वास्तव खुप भयाण दिसत आहे. त्यामुळे झाडांच्या रोपं बाळसे धरण्याऐवजीच त्यांना मारण्याचे पाप कोणी केले?, पैसे कोणाच्या खिशात गेले हा संशोधनाचा विषय बनला आहे.
झाडांच्या लागवडीकरता आणि संवर्धनाकरता शासन कोटय़ावधी रुपये खर्च करते आहे. शहरालगत असलेल्या चारभिंतीच्या डोंगराच्या एका सुळक्यावरही झाडांची लागण यावर्षीच्या पावसाळय़ात सामाजिक वनीकरणाकडून करण्यात आली. त्याकरता पावसाळयात खड्डे खोदण्यात आले. हे खड्डे खोदताना जो नियम असतो जो निकष असतो तो मात्र पुर्ण केला नाही. उद्दीष्ठ पूर्ण करण्यासाठी कसेबसेच कामकाज पूर्ण झाल्याचे आत्ता निदर्शनास सामाजिक कार्यकर्त्यांच्या, वृक्षप्रेमींच्या निदर्शनास आले. अलिकडे झाडे जगवण्याचा त्रास नको म्हणून दहा फुटांची, बारा फुटांची झाडे लावण्याची प्रथा रुढ झाली आहे. सामाजिक वनीकरणाने यावर्षी कोटय़ावधी झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करण्याची गडबड केली. अजिंक्यताऱयाच्या पायथ्याला असलेल्या चार भिंतीच्या समोर असलेल्या डोंगराच्या एका सुळक्यावर झाडांचे रोपण करण्याकरता खड्डे खोदले गेले. ते खड्डे नुसतेच वरवरचे खोदले गेले. आजही त्या खड्डय़ात त्यावेळी लावले गेलेले रोप सापडले तर नवलंच अशी अवस्था सामाजिक वनीकरणाने केलेल्या वृक्षारोपणाची झालेली आहे. त्यामुळे नेमका पैसा कोणाच्या खिशात गेला?, झाडे किती लागली याबाबत मात्र शोकांतिका आहे.
निगा राखली गेली पाहिजे
सामाजिक वनीकरणातून रोजगारावर झाडे लावतात. खड्डेs खणले काय?, नियम अटीने खड्डे लागतात. खत वेळेवर दिले जात असते. पाणी अपुरे पडते.जास्त प्रमाणात लावल्याने त्याची निगा राखाली जात नाही. जकातवाडी ग्रामपंचायतीने चांगले खड्डे खोदले. त्यात व्यवस्थीत झाडे लावली आणि चांगली आली आहेत.
उमेश खंडूझोडे कुरणेश्वर मार्निंग वॉक ग्रुप
संगोपण चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे
आपण जी झाडे लावतो. त्यांचा सांभाळ योग्य पद्धतीने झाला पाहिजे. लावलेलं झाडं हे मुलासारखं असते. त्यांला काही दुखल खुपल हे बघण आपली जबाबदारी असते. त्या जबाबदारीतून ते घडत. आजही ग्रामीण भागात आर्वजून माझ्या दृष्टीस पडलेली बाब म्हणजे ज्या झाडाखाली वाद होतात ते झाड फळं देत नाही. त्यामुळे झाडालाही कळतं, समजतं. भावभावना असतात. त्यांचे संगोपण चांगल्या पद्धतीने झाले पाहिज्जे.
डॉ.रवींद्र भारती- झुटींग वनराई चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष
जसे झाडाचे रोप असेल तसा खड्डा असावा
झाडांचे रोप लावतानाही काही नियम व अटी आहेत. त्या नियमनुसारच झाड लावले गेले पाहिजे. व्यवस्थित खड्डा जर खोदला गेला नाही त्या खड्डय़ात झाड लावून काळजी घेण्याकरता कुपण घेतले गेले पाहिजे. खड्डय़ातील मातीही योग्य प्रकारची असली पाहिजे. खत किती प्रमाणात टाकले गेले पाहिजे याचेही प्रमाण आहे. तरच लावलेले रोप चांगले तग धरते.
अनिल भोसले सातारा
वृक्षारोपणाचा हेतू साध्य व्हावा
आपण पर्यावरण वाचवा म्हणून जे सांगतो आहे. त्याकरता झाडे लावतो खरी परंतु प्रत्यक्षात त्या झाडांचा प्रसिद्धीकरता काहीजण उद्देश ठेवतात. पुन्हा त्यांची काळजी घेत नाहीत. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाचा उद्देश साध्य होत नाही. मनापासून गोष्ट केली गेली तर ती साध्य होते. त्याकरता झाडे लावा आणि झाडे जगवा हे कशाकरता म्हटले गेले आहे. त्याप्रमाणेचे वृक्षारोपणाचा हेतू साध्य व्हावा.
ऍड. सिमंतीनी नुलकर रानवाटा सामाजिक संस्था