संसद भवनातील घुसखोरी प्रकरणानंतर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली आहे. सुरक्षेतील त्रुटीला जबाबदार धरत लोकसभा सचिवालयानं ८ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
बुधवारी काही तरुणांंनी हुकूमशाही चालू देणार नाही अशा घोषणा देत संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था भेदून आत प्रवेश केला. त्यांनी संसदेच्या आवारात व लोकसभेत धूर केला. त्यामुळं देशभरात खळबळ उडाली. सागर शर्मा, मनोरंजन डी के, अमोल शिंदे आणि नीलम कौर यांचा आंदोलकांमध्ये समावेश होता. लोकसभेत घुसलेल्या दोघांना सुरक्षा रक्षकांनी खासदारांच्या मदतीनं पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर, बाहेर आंदोलन करणाऱ्या दोघांना संसद भवनातील सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं. एकूण पाच जणांनी मिळून संसदेत घुसखोरीचा कट आखल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी संसद मार्ग पोलीस ठाण्यात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.