श्रीकृष्ण जन्मभूमीचा प्रस्ताव राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत आणण्याची तयारी; 16-18 फेब्रुवारीला दिल्लीत बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अयोध्येनंतर आता मथुरा भाजपच्या अजेंड्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीतील भारत मंडपम येथे पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार असून त्यात श्रीकृष्ण जन्मभूमीचा प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू आहे. या बैठकीला भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, प्रदेशाध्यक्षांसह राष्ट्रीय परिषदेचे 8,000 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
भाजप राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीचा मुख्य अजेंडा श्रीकृष्ण जन्मभूमीचा प्रस्ताव असू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हा प्रस्ताव थेट भाजपनेच मांडायचा की विहिंपसारख्या अन्य संघटनेच्या माध्यमातून आणायचा, यासंबंधी सध्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. पक्षाने ते स्वत: मांडल्यानंतर इतर संस्था-संघटनांचा पाठिंबा घ्यावा, असे बहुतांश नेत्यांचे मत आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीबाबतचा प्रस्ताव हा महत्त्वाचा ठराव असून येत्या काही वर्षांत तो पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या सत्ता समतोलाला कारणीभूत ठरू शकतो, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी प्रस्ताव आणावा, असाही एक मतप्रवाह आहे.
मंदिर पाडून मशीद बांधली : इतिहासकार
प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांनी ज्ञानवापी प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर मोठे वक्तव्य केले आहे. मथुरा आणि काशीची मंदिरे पाडून मशीद बांधली गेली असून अनेक इतिहासाच्या पुस्तकातही याचा उल्लेख आहे. मथुरा आणि काशीची मंदिरे पाडण्याचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी कोणत्याही न्यायालयाची गरज नाही, असे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय मार्क्सवादी इतिहासकार इरफान हबीब यांनी म्हटले आहे. इरफान हबीब हे उजव्या विचारसरणीच्या आणि इस्लामिक कट्टरतावादाच्या विरोधात ठाम भूमिकेसाठी ओळखले जातात.