सांगली : प्रतिनिधी
दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत जत तालुक्याचा समावेश करावा, या मागणीसाठी जत तालुक्याच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी चांगलीच कंबर कसली आहे. दुष्काळाचा सर्वात जास्त फटका सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला बसत असताना दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत जत तालुक्याचे नाव कोठेच नसल्याने जत तालुक्यातील नागरीकांसह आता लोकप्रतिनिधी अधिक आक्रमक झालेले पहायला मिळत आहे. आज तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
या सर्वपक्षीय आंदोलनात काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्त्यांसह अनेक संघटनांनी सहभाग दर्शविला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मतदारसंघातील राजकीय वैऱ्यांची दुष्काळाच्या प्रश्नावरून मने जुळली आहेत. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत आणि भाजपचे माजी आमदार विलास जगताप हे आपल्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. या लाक्षणिक उपोषणानंतर सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या काळात मोठे आंदोलन उभा करून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
आंदोलन स्थळावरून बोलताना काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, शासनाने नागपूरच्या ज्या कंपनीकडून अॅपच्या माध्यमातून सर्वे केला आहे तो चुकिचा आहे. शासनाने वस्तूनिष्ठ सर्वे करावा. प्रशासनाने जत तालुक्याचा दौरा करून इथली परिस्थीती पहावी असे आवाहन केले.
तसेच भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही चुकिचे सर्वेक्षण केल्याचा ठपका ठेवत ज्या तालुक्यात भरपूर पाणी आहे त्याला दुष्काळी दाखवण्यात आले आहे. तर जिथे पाणीच नाही त्या तालुक्यांना या यादीमध्ये कोणतेही स्थान नाही त्यामुळे मी शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत असल्याचे सांगितले. तालुक्याच्या प्रश्नासाठी दोन कट्टर विरोधक एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात सकारात्मक चर्चा सुरू आहे.