वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे झालेल्या विश्व चषक तिरंदाजी स्टेज 2 मध्ये भाग घेऊन परतलेल्या भारतीय तिरंदाजांची केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. भारताने या स्पर्धेत एक सुवर्णपदकासह एकूण पाच पदके जिंकली.
पुरुष कंपाऊंड संघातील अभिषेक वर्मा, रजत चौहान, अमन सैनी यांनी फ्रान्सच्या संघाचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. याशिवाय एक रौप्य व तीन कांस्यपदकेही भारतीय तिरंदाजांनी या स्पर्धेत मिळविली. पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये मोहन भारद्वाजने रौप्य मिळविले. ‘या सर्वच तिरंदाजांनी कठोर परिश्रम घेत ही पदके मिळविताना देशाचा लौकीकही वाढविला असल्याने ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत. देशासाठी कार्य करणाऱया या खेळाडूंचे कौतुक करण्याची सवय आम्ही लावून घ्यायला हवी,’ अशा शब्दांत क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी त्यांचा गौरव केला.
अभिषेक वर्मा याप्रसंगी म्हणाला की, ‘आम्ही आशियाई क्रीडा स्पर्धेची तयारी करीत असून आपला संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अचूकता व तंत्र यात भारतीय तिरंदाजांनी बरीच सुधारणा केली आहे. पायाभूत सुविधा, कोचिंग, अनुभव, सरकार व फेडरेशनकडून आयोजित केलेली शिबिरे अशा माध्यमांतून आम्हाला सर्वतोपरी साहय़ व समर्थन मिळत असल्यामुळेच आम्ही ही मजल मारू शकलो. हाच जोम कायम ठेवत जूनमध्ये होणाऱया विश्व चषकाच्या पुढील टप्प्यात आणखी पदके जिंकून परत येण्याचा आम्हाला विश्वास वाटतो,’ असेही तो म्हणाला.