समुद्र वसने देवी पर्वतस्थन मंडले …..
विष्णू पत्नी नमोस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे….
असे म्हणत सकाळी ज्या धरती मातेच्या अंगाखांद्यावर बागडतो ती अवनी गंधवती कशी, रसवती कशी? असे अनेक प्रश्न फेर धरून नाचायला लागले. खरं तर या साऱ्या पंचमहाभूतांना पेलणारी एकमेव धरती म्हणजे वेगळेच रसायन आहे.डॉ. बाबा आमटे यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेय ‘माती म्हणजे असं रसायन की जे शास्त्रज्ञांना आजपर्यंत कुठल्याच प्रयोगशाळेत बनवता आलं नाही.’ समर्थ रामदास याचं वर्णन पुढीलप्रमाणे करतात……‘जे जे काही दिसे, ते ते सर्व नासे…
अशा साऱ्या गोष्टी पेलणारी धरणी म्हणजे विलक्षणच.
या मातीत काहीही पेरा, ती भरभरून प्रतिसाद देते. प्रत्येकाचे रंग, रस, आकार, गंध, सारं वेगळंच…मिरची तिखटपणा घेऊन येते तर ऊस गोडपणा. फुलांचे रंग, आकार, गंध निराळे अशा या मातीची महती म्हणजे कवी आणि लेखकांचा जिव्हाळ्याचा
विषय.
एकदा एक आजी आजोबा लंडनहून परत आल्यावर त्यांची नातवंडे काय आणलंय म्हणून बघायला गेले. त्यात त्यांना एका डबीत आणलेली माती दिसली. आजोबांनी माहिती देताना सांगितले ती शेक्सपिअरच्या घराजवळची माती आहे. त्यांचं बालपण, तारूण्य, त्यांच्या विचारांची घालमेल ज्या मातीने अनुभवली असेल, स्पर्शात जपली असेल ती ही माती. अशी माती धारण करणारे पृथ्वी तत्व या सगळ्या पंचमहाभूतांचा अंश आहे.
प्रत्येक तत्वाचे जड आणि नश्वर स्वरूप म्हणजे ही वसुंधरा. साऱ्या जीवसृष्टीला अन्न, वस्त्र, निवारा पुरवणारी म्हणून अवनी. समर्थांच्या भाषेत ‘सप्त द्वीपवती पृथ्वी..काय म्हणोनी सांगावी..
नवखंडे मिळोनी जाणावी वसुंधरा.. नाना देव नाना नृपती..नाना भाषा नाना रिती… लक्ष चौऱ्यांशी उत्पत्ती मिळोनी पृथ्वी.