वाहने सुसाट, अपघातांची मालिका : गतिरोधकांची मागणी
बेळगाव : भाग्यनगर, दुसरा क्रॉस येथील रस्त्यावर लहान, सहान अपघात वाढू लागले आहेत. वाहने सुसाट हाकली जात असल्याने वळणावर अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यातूनच दररोज वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडू लागले आहेत. या मार्गावर अपघात टाळण्यासाठी गतिरोधकाची तातडीने उभारणी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी आणि वाहनधारकांनी केली आहे. भाग्यनगर परिसरात रहिवाशांची संख्या मोठी आहे. शिवाय हरिमंदिर, आशीर्वाद आणि रामनाथ मंगल कार्यालय असल्याने वाहनांची ये-जा वाढली आहे. मात्र बेधडक आणि बेशिस्तपणे वाहने चालविली जात असल्याने धोका निर्माण होऊ लागला आहे. वळणावर वाहनांचे अपघात घडू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर एकाचा बळीदेखील गेला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाला याबाबत जाग आलेली नाही. बेधडक वाहने इतर वाहनांना आणि इतर स्थानिक पादचाऱ्यांना त्रासदायक ठरू लागली आहेत. काही तरुण स्टंटबाजी करत अतिवेगाने वाहने चालवू लागले आहेत. त्यामुळे दैनंदिन अपघात घडू लागले आहेत. यातूनच तू-मी करत वादावादी घडू लागली आहे. वाहने जोरात चालविली जात असल्याने समोर वळण आहे, हे लक्षात येत नसल्याने अपघात घडू लागले आहेत. अलिकडे या रस्त्यावर अपघात नित्याचेच ठरू लागले आहेत. मनपाने या रस्त्यावर वाहनांना शिस्त लावण्यासाठी गतिरोधक उभे करावेत, अशी मागणी होत आहे.